लोणंद (प्रतिनिधी) – लोणंद-सातारा रस्त्यावरील लोणंदच्या हद्दीतील खड्ड्यांचे आकार दिवसेंदिवस वाढत आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी आणि रस्ता सुस्थितीत आणण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी अनेक वेळा विविध मार्गांनी प्रयत्न केले आहेत; परंतु संबंधित शासकीय विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था किंवा दानशूर व्यक्तींनी हे खड्डे “दत्तक’ घेऊन ते बुजवावेत, असे उपरोधिक आवाहन साथ प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या शासन दरबारी वारंवार मांडूनदेखील त्यांचे निवारण करण्याच्या हालचाली होत नाहीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवले जाते, तर बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे बोट दाखवले जात आहे. या साऱ्यातून सामान्य जनतेचे हाल होत आहेत.
या खड्ड्यांचा फटका पादचारी, रुग्ण, वयोवृद्ध, दिव्यांग नागरिक, दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना बसत आहे. या रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यामध्ये अनेकांचे बळी गेले आहेत, तर अनेक जण कायमस्वरूपी अधू झाले आहेत. आता आपल्या हितासाठी सर्वसामान्य जनतेलाच रस्त्यावर उतरावे लागणार आहे.
शासकीय यंत्रणा या समस्येकडे कानाडोळा करत असाव्यात. या यंत्रणा गांधारीच्या भूमिकेत आहेत की, सरकारला भीक लागली आहे? खड्डे बुजविण्याची जबाबदारी सरकार घेत नसेल, तर हा अन्याय आम्ही फक्त सहन करायचा का? शासकीय यंत्रणांची उदासीनता व निष्क्रियतेचे आपण बळी व्हायचे का, असे प्रश्न प्रवासी व नागरिक विचारत आहेत.
यापैकी प्रत्येकी एक खड्डा शहरातील संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांनी दत्तक घेऊन बुजवला तर रस्ता सुरक्षित होऊ शकतो, असा टोला साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी लगावला आहे.
जिल्ह्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी लोणंदमधील काही कार्यकर्त्यांनी संपर्क साधून या रस्त्याच्या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार खासदारांनी संबंधितांना तशा सूचनाही दिल्या होत्या; परंतु खासदारांच्या सूचनेलाही सरकारी बाबूंनी “वाटाण्याच्या अक्षता’ लावून केराची टोपली दाखवली की काय, अशी शंका स्थानिक नागरिक व प्रवासी उपस्थित करात आहेत.