मुंबई – महाविकास आघाडी सरकारने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते तथा भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना पुरवण्यात येत असलेल्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला धोका कमी आहे असे राज्य सरकारला वाटले असावे त्यामुळे माझी सुरक्षा कमी केली असावी. मात्र सुरक्षा कमी केल्याने आपल्याला काही एक फरक पडत नाही. कारण मी कुठेही घाबरत नाही. तसेच सुरक्षेशिवाय कुठेही जाऊ शकतो. सुरक्षा कमी केल्यामुळे मी माझे फिरणे थांबवणार नाही.
एखाद्या व्यक्तीला धोक्याच्या संकेतानुसार सुरक्षा पुरविली जाते. आमच्या सरकारने ही अधिकृत प्रणाली अवलंबली होती. सध्या अशा लोकांनाही सुरक्षा पुरवली जात आहे ज्यांना कोणत्याही प्रकारे धोका नाही, असे म्हणत फडणवीस यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.
सुरक्षा कमी केल्यामुळे आपली काहीच तक्रार नसल्याचेही फडणवीस यांनी सांगून मी जनतेतला माणूस असल्याने आपल्याला काहीही चिंता नसल्याचे त्यांनी सांगितले.