लोकसभेची निवडणूक 2024 मध्ये होणार आहे. त्याला आता एक वर्षापेक्षाही कमी कालावधी राहीला आहे. असे असतानाच महाराष्ट्रात झालेला राजकीय भूकंप पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भारतीय जनता पार्टीला मोठा लाभ देणारा ठरणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करणे हा खरेच भाजपसाठी मोठा फायद्याचा विषय ठरला आहे.
लोकसभेची गणिते –
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. सर्वात जास्त जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रातून लोकसभेवर सर्वाधिक खासदार निवडून जातात. राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसची चांगली पकड आहे. राज्यात झालेल्या महाविकास आघाडीचे सूत्रधार आणि निर्माते शरद पवारच होते. तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात आता जी विरोधकांनी संयुक्त आघाडी आकाराला येत आहे त्यातही पवार यांचीच भूमिका महत्वाची आहे. मात्र आजच्या घटनेने पवार यांच्याच पक्षात (एका अर्थाने घरात) फूट पडल्यामुळे ते भाजपच्या पथ्यावर पडले आहे.
त्याचे कारण म्हणजे विरोधी पक्षांच्या संभाव्य आघाडीने देशभरात भाजपच्या विरोधात एकास एक लढत देण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार देशातील 450 जागांवर विरोधी पक्षांकडून भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात एकच उमेदवार असेल. ज्या राज्यात जो प्रादेशिक पक्ष भक्कम असेल त्या पक्षाच्या उमेदवाराला अन्य विरोधी पक्ष पाठिंबा देतील. असे करून मतांची विभागणी टाळण्याचा काटेकोर प्रयत्न केला जाणार आहे. ही मांडणी भाजपसाठी नक्कीच उपयुक्त नाही. त्यामुळे आता किमान महाराष्ट्रात तरी भाजपला आपल्या परिने थोडीशी श्वास घेण्यास जागा मिळण्याची शक्यता आहे.
त्याचे कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अगोदर खिळखिळी करण्यात आली. शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली. उध्दव ठाकरे यांची साथ सोडून बरेच आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत निघून गेले. आज शिंदे मुख्यमंत्री आहे. कार्यकर्त्यांची संख्या आणि आमदारांची संख्या जरी शिंदे यांच्या बाजूने अधिक असली तरी जनमत कोणत्या बाजूने कौल देईल याचा अद्याप कोणाला अंदाज बांधता आलेला नाही. तरीही मोठे नेतेच पक्षातून बाहेर पडल्यामुळे शिवसेना जी पूर्वी अभेद्य मानली जात होती ती आता काहीशी पंगू झालेली आहे.
त्यामुळे विरोधात लढल्यावर शिवसेनेकडून जे आव्हान भाजपला दिले जाऊ शकले असते त्यातील जोर काहीसा कमी झाला आहे. राष्ट्रवादीही महाराष्ट्रातला आणखी एक प्रबळ पक्ष. आता या पक्षातला सगळ्यांत लोकप्रिय नेता म्हणून ओळख असलेले अजित पवार यांनीही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भाजपला मिळणाऱ्या आव्हानाची तिव्रता नक्कीच कमी होणार आहे. काही सर्वेक्षणांत महाराष्ट्रात भाजपच्या जागा कमी होत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यात आता बदल होण्याची दाट शक्यता आहे.
कॉंग्रेस पक्ष देशभरात उभारी घेत असला तरी महाराष्ट्रात अजून पक्षात तेवढे चैतन्य संचारलेले नाही. कॉंग्रेसचे बरेचसे बडे नेते गेल्या काही काळापासून उदासीन आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत त्यांनी सहभाग घेतल्यानंतर ही नेतेमंडळी पुन्हा आपल्याच कोशात आहेत. यातीलही काही नेते कुंपणावर असल्याच्या चर्चा अधुनमधुन सुरू असतात. या बातम्या खऱ्या ठरल्या तर कॉंग्रेसचा नगण्य आणि फुटीमुळे खिळखिळ्या झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचा मर्यादीत धोका भाजपला लोकसभा निवडणुकीत आपले ध्येय साध्य करण्यास उपयुक्त ठरणार आहे.