नवी दिल्ली – लोकसंख्येबाबत जगात भारताने पहिला क्रमांक पटकावला असल्याने लोकसंख्या नियंत्रणासाठी विविध उपायही योजले जात आहेत. त्यासाठी अनेक कायदे आणि नियमही आहेत. याच नियमांचा आणि धोरणाचा वापर करून छत्तीसगड सरकारने एका पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे. या कॉन्स्टेबलने आपल्या पत्नीच्या चौथ्या बाळंतपणासाठी रजेचा अर्ज केला होता; पण या मुलाचा जन्म होण्यापूर्वी छत्तीसगड सरकारने कारवाई करून या पोलिसाला निलंबित केले आहे.
लोकसंख्या नियंत्रण धोरणाप्रमाणे सरकारी नोकरीत असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला दोन पेक्षा जास्त मुलांना जन्म देता येत नाही. 2001 नंतर हा नियम अमलात आणला आहे. त्याचा वापर करून आणि राज्य सरकार सेवा नियम आधारे या पोलिसावर कारवाई करण्यात आली आहे. या पोलिसाने जेव्हा आपल्या पत्नीच्या बाळंतपणासाठी रजेचा अर्ज केला होता, तेव्हा त्याला अगोदरच तीन मुले असल्याचे लक्षात आल्यावर ही कारवाई करण्यात आली.
छत्तीसगडमध्ये अशा प्रकारची परिस्थिती असली तरी दुसरीकडे सिक्कीमसारख्या राज्यामध्ये मात्र लोकसंख्या वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे. सिक्कीम सरकारने एका योजनेची घोषणा केली असून एक पेक्षा जास्त मुलांना जन्म देणाऱ्या महिलांना पगारवाढ आणि इतर सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसंख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे सिक्कीम हे भारतातील एकमेव राज्य आहे. जगातील सर्वात मोठे कुटुंबही भारतातच असल्याची नोंद आहे. ईशान्य भारतातील मिझोराममधील चाना परिवार हा जगातील सर्वात मोठे कुटुंब मानले जाते. या कुटुंबाचा प्रमुख असलेल्या जिओनी चाना याचे जून 2021 मध्ये निधन झाले होते. त्याच्या 39 पत्नी, मुले आणि नातवंडे मिळून त्याच्या कुटुंबामध्ये तब्बल 167 लोक होते. बहुपत्नी प्रतिबंधक कायदा लागू असतानाही चानाने 39 विवाह केले होते.