बीड – येत्या 23 डिसेंबरला बीड शहरात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. या सभेत 24 डिसेंबरनंतरच्या आंदोलनाबाबात चर्चाही होणार आहे. मात्र त्यापूर्वीच आता या सभेच्या पार्श्वभूमीवर 125 मराठा आंदोलकांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी घडलेल्या जाळपोळी प्रकरणातील जामीन मिळालेल्या आंदोलकांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे. जरांगे यांच्या सभेपूर्वी बीड पोलीस ॲक्शन मोडवर असल्याचे पाहायला मिळत आहे. नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबतही आवाहन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, सभेमध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून 125 मराठा आंदोलकांना देखील नोटीसा बजावल्या आहेत. कायदा सुव्यवस्था पाळावी, वैयक्तिक किंवा शासकीय मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
23 डिसेंबर रोजी मनोज जरांगे यांची बीड बायपास रोडवर सभा होणार आहे तेथील तयारीही आता पूर्णत्वास येत आहे. सभास्थळाची पाहणी छत्रपती संभाजीनगरच्या विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केली. त्यांच्यासोबत बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे देखील उपस्थित होते.
कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन –
सभेला येणारे मराठा बांधव आणि इतर नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्याचबरोबर धुळे-सोलापुर या महामार्गाच्या बाजूलाच ही सभा होणार असल्याने, महामार्गावरची वाहतूक देखील वळवण्यात आली आहे. मात्र, महत्त्वाच्या वाहनांना या मार्गावरून जाता येणार आहे. त्यामुळे, त्यांना देखील काही त्रास होणार नाही अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सभेच्या आयोजकांना दिलाय आहेत. तसेच, सभेसाठी बीडसह बाहेर जिल्ह्यातील पोलीस देखील बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले आहेत. तर, सभेदरम्यान उपद्रवी लोकांवर पोलिसांची नजर असल्याची माहिती ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आहे.
मनोज जरांगे संतापले –
पोलिसांनी मराठा आंदोलकांना नोटीसा पाठविल्या आहेत त्याबाबात प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की, नोटीसा पाठविण्याचे काहीही कारण नाही. त्यांनी नोटीसा का पाठवल्या काही कळत नाही. मुंबईतही जमावबंदी आदेश लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. आमची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे मात्र आम्ही लोकशाही मार्गाने कायद्यात राहून आंदोलन करणार, ते आम्हाला रोखू शकत नाही. सरकार नोटीस देऊन चिथावणी देतंय का? असा सवालही त्यांनी केला.