पुणे – विठ्ठल रामजी शिंदे पूल अर्थात बालगंधर्व पुलावर नागरिकांकडून बेशिस्त पार्किंग करण्यात येत होती. यामुळे वाहतुकीला अडथळा झाला होता. याबाबतची बातमी दै. “प्रभात’ने दि. 1 ऑगस्टच्या अंकामध्ये प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी “बेशिस्त’ पार्किंगला आळा घालण्यासाठी कारवाईला सुरुवात केली आहे.
कारवाईमुळे बेशिस्त पार्किंगला लगाम बसणार आहे. अनेक दिवसांपासून भेडसावणारी ही समस्या सुटत असल्याने स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बालगंधर्व ते ओंकारेश्वरपर्यंत दुतर्फा विनापरवानगी चारचाकी थांबविण्यात येतात. ओंकारेश्वर मंदिरासमोर बसेस बेशिस्तपणे उभ्या केल्या जातात. त्यामुळे या गाड्यांमुळे “अरुंद’ असणाऱ्या पुलाची “रुंदी’ कमी होते. शिवाय वाहतूक कोंडीही होत आहे. या ठिकाणी पार्किंगचा कोणताही “साईन बोर्ड’ नसताना थांबणाऱ्या या गाड्यांकडे अनेकदा वाहतूक विभागाकडून दुर्लक्ष केले जात होते. मात्र, गेले दोन दिवस या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.