जालना – जालन्यात मराठा आंदोलकांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. आंदोलनासाठी उभारण्यात आलेल्या मंडपात पोलीस घुसले आणि त्यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे समजते.आंदोलकांकडून दगडफेक झाल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील या घटनेवर भाष्य केले आहे.
शरद पवार म्हणाले, “उपोषण थांबावावं असा पोलिसांचा आग्रह होता. आंदोलक आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली होती. आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर काही कारण नसताना लाठी हल्ला झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असल्याचे पवार यांनी यावेळी म्हटले. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.गृह खात्याकडून अशी अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे आहे. या लाठी हल्ल्याचा आपण निषेध करत असल्याचे देखील पवार यावेळी म्हणाले.
काय झालं नेमकं?
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचं आरक्षणासाठी उपोषण सुरू होतं. तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे आंदोलनस्थळी गोंधळ उडाला. लाठीचार्जची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळातून देखील संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
आंदोलकांवर लाठीचार्ज करतानाचे पोलिसांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावेळी आंदोलकांकडून दगडफेक झाल्याचा आरोप देखील पोलिसांकडून करण्यात आला आहे. मात्र यानंतर आंदोलनकडून संताप व्यक्त केला जात आहे.