राजगुरूनगर( प्रतिनिधी ) :- गेल्या वर्षभरात एकमेकांविरोधात अनेक राजकीय कुरघोडी व तेवढ्याच टीका टिप्पणी करणाऱ्या खेड तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यासह कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. १०) पीएमआरडीएच्या निवडणुकी दरम्यान हसत खेळत एकमेकांशी संवाद साधला.
खेड पंचायत समिती आवारातील हे चित्र पाहुन अनेकांना सुखद धक्का बसला. राज्यात महाविकास आघाडीचे घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना व आघाडी विरोधक असलेल्या भाजपचे तालुक्यातील प्रमुख नेते या मैफलीत सहभागी झाले होते. पीएमआरडीए तथा पुणे महानगर नियोजन समिती संचालक पदासाठी आज (दि.१०) बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. खेड पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील १०६ मतदार असून त्या मतदारांनी मतदानात सहभाग घेतला.
तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वसंत भसे (सांगूर्डी) व शिवसेनेचे संतोष गोरडे (गोसासी) या उमेदवारांसह सर्वपक्षीय समर्थक यावेळी प्रवेशद्वारावर उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, एड सुखदेव पानसरे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, विलास कातोरे, अशोक राक्षे, मयुर मोहिते पाटील, अरुण थिगळे, शिवसेनेचे अशोक खांडेभराड, विजयाताई शिंदे, ज्योती आरगडे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, सुरेश चव्हाण, केशव अरगडे, एड गणेश सांडभोर, मारुती सातकर, यांचा त्यात समावेश होता. मतदान केंद्रावर आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, माजी जिप सदस्य अरुण चांभारे, पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, शिवसेनेचे संजय घनवट, माजी सदस्य अनिल राक्षे, लक्ष्मण मुके, नवनाथ होले आदींनी भेट दिली.
नेहमी विरोधात भूमिका घेणारे तालुक्यातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते यांनी एकमेकांशी संवाद वाढल्याने मैत्रीपूर्ण लढत या निवडणुकीत पहावयास मिळाली. ही निवडणूक पुढे होणाऱ्या बाजार समिती, जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक, राजगुरुनगर, चाकण, आळंदी नगर परिषदा, सहकारी सोसायट्या जिप पस निवडणुकीची तयारी असल्याने आणि करोना दुसऱ्या लाटेनंतर होणारी पीएमआरडीची पहिली निवडणूक असल्याने राजगुरुनगर येथील मतदान केंद्रावर तालुक्यातील भाजप, सेना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आगामी निवडणुकीकांमधील इच्छुक उमेदवारही कार्यकर्त्यांसह भेटी गाठीसाठी राजगुरुनगर शहरात दाखल झाले होते. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे मतमोजणी नंतरच समजणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.