पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा रडतखडत भार पेलणार्या पीएमपीएमएलचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अहवालात ३६ कोटी ९२ लाख रूपयांचा नफा झाल्याचे जाहीर केले आहे. मात्र, महापालिकेच्या लेखा परीक्षणात हा दावा खोडून काढण्यात आला आहे. पीएमपीला नफा नव्हे, तर तब्बल ७२६ कोटींचा तोटा ( संचलन तूट) झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पुढील आर्थिक वर्षासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ६० :४० च्या प्रमाणात ही तूट पीएमपीला देणार आहे. महपालिकेकडून दरवर्षी पीएमपीच्या संचलन तुटीचे लेखा परीक्षण करून ययाबाबतचा अहवाल स्थायी समितीत सादर केला जातो. या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
अहवालानुसार २०२२-२३ या वर्षात पीएमपीला तिकीट तसेच पासेस विक्रीमधून सुमारे ५८७.९८ कोटींचे उत्पन्न मिळालेले असून, प्रत्यक्षात पीएमपीचा खर्च १३१४.७६ कोटी रूपयांचा झाला आहे. तर ही संचलन तूट या वर्षात ६८ कोटी रुपयांनी वाढली असून २०२१-२२ मध्ये ही तूट ६५८.७५ कोटी रुपयांची होती.
जमा- खर्चाचा ताळमेळ बसेना
या अहवालानुसार २०२२-२३ मध्ये पीएमपीच्या बसेस १२ कोटी ८० लाख किलोमीटर धावल्या आहेत. त्यातील १९ लाख ८५ हजार डेड किलोमीटर आहे. यानुसार पीएमपीला प्रति किलोमीटर १०२ रुपये ७२ पैसे खर्च आला असून, वर्षभरात मिळालेले वाहतुकीचे उत्पन्न प्रति किलोमीटर ४६.६६ पैसे मिळाले आहे.
त्यामुळे पीएमपी प्रतिदिन प्रतिकिलोमीटर ५६ रूपये ६ पैसे तोट्यात धावत आहे. त्याचा परिणाम संचलन तुटीवर होत असून ही रक्कम दरवर्षी वाढतच आहे. शासनाच्या आदेशानुसार या तुटीच्या रकमेतील ६० टक्के हिस्सा पुणे, तर ४० टक्के हिस्सा पिंपरी-चिंचवड महापालिकेने देणे बंधनकारक आहे. त्यामुळे पीएमपीला प्रत्येक वर्षी दोन्ही महापालिका तूट देत असल्याने पीएमपीचा खर्च वाढत असतानाच उत्पन्नाचा आकडा मात्र कमी होत आहे. तर धक्कादाक बाब म्हणजे पीएमपीचा एकही मार्ग प्रती किलोमीटर खर्चाएवढे उत्पन्न मिळवून देणारा नसल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रवासी संख्येत घट, तरीही दिलासा
या अहवालात पीएमपीची प्रवासी संख्या २०२२-२३ मध्ये प्रतिमहिना लक्षणीय घटल्याचे नमूद केले आहे. २०११-१२ मध्ये पीएमपीची प्रवासी संख्या सर्वाधिक म्हणजेच प्रती महिना सरासरी ३ कोटी ८२ लाख २१ हजार ४५६ होती ही संख्या या वर्षानंतर सातत्याने घटत असून २०२२-२ ३ मध्ये ती सरासरी ३ कोटी १५ लाख ३४ हजार १७५ नोंदविली गेली आहे.
मात्र, ही संख्या घटूनही पीएमपीला काहीसा दिलासा मिळालेला आहे. २०२०-२१ मध्ये करोनामुळे ही संख्या ८६ लाख ४३ हजार ६२२ वर आली होती. तर २०२१-२२ मध्ये ती १ कोटी ७२ लाख ८२ हजार ०९७ वर गेली तर २०२२-२३ मध्ये ती ३ कोटी १५ लाख ३४ हजार १७५ नोंदवली गेली आहे.
ही आहेत तुटीची प्रमुख कारणे
– तिकीट विक्री व पासच्या उत्पन्नात घट
– तिकीटदरवाढ न केल्याने नुकसान
– सक्षम तपासणी पथकांचा अभाव
– उत्पन्नवाढीसाठी विशेष प्रयत्नाचा अभाव
– खर्चात बचत करण्याच्या उपाय योजनांचा अभाव
– सेवकांवरील वेतनखर्चात वाढ