दिल्ली – देशाच्या पंतप्रधानांनी काल लोकसभेत एक तासाचे भाषण केले. यामध्ये त्यांनी कोरोना, रोजगार, महागाई अशा विविध विषयांवर देशाला एक दिशा द्यावी अशी अपेक्षा होती. दुर्दैव की पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलले. ही दुःख देणारी गोष्ट आहे. प्रधानमंत्री जी आपसे नाराज नहीं, हैरान हू मैं, अशी नाराजी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. काल (सोमवार, दि.7) लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात महाराष्ट्राला कोविड स्प्रेडर म्हणून संबोधले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली.
नरेंद्र मोदी हे फक्त भाजपाचे नाही तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. एका पक्षाच्यावतीने आणि एका राज्याच्यावतीने देशाचे पंतप्रधान बोलतात त्याचे फार दुःख झाले. पंतप्रधानपद हे पक्षाचे नाही तर संविधानिक पद आहे , याचे स्मरणही खा. सुप्रिया सुळे यांनी यावेळी करून दिले. महाराष्ट्राने फुल ना फुलाची पाकळी म्हणून भाजपाचे 22 खासदार निवडून दिले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांना त्या पदावर बसविण्याचा मोठा सिंहाचा वाटा हा महाराष्ट्रातील मतदारांचाही आहे. त्या महाराष्ट्राचा व मतदारांचा अपमान कोविड सुपर स्प्रेडर म्हणून पंतप्रधानांनी केला हे धक्कादायक आहे, असे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कोविड सुपर स्प्रेडर म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख करताना पंतप्रधान महोदय रेल्वे ही केंद्र सरकार चालवते. तरीही पंतप्रधान बोलतात की महाराष्ट्राने लोकांना पाठवले. आम्ही एसटी, गाडी, टेम्पो, ट्रक पाठवू शकतो मात्र रेल्वे पाठवू शकत नाही, असे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
लॉकडाऊन होण्याआधी खा. सौगता रॉय यांनी संसद सुरू असताना पंतप्रधानांकडे जाऊन कोविडच्या पार्श्वभूमीवर संसद लवकर संपवण्याची मागणी केली होती. मात्र पंतप्रधान यांनी त्यावेळी आता नाही नंतर बघुया काय करायचे, अशी प्रतिक्रिया दिली. त्याच कारण ही सर्व मंडळी मध्य प्रदेशचे सरकार पाडण्यात व्यस्त होती, अशी टीका खा. सुप्रिया सुळे यांनी केली.
सातत्याने महाराष्ट्रावर टीका करणे, राज्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प हे महाराष्ट्रातून बाहेर नेणे, मुंबईचे महत्त्व कमी करणे यात त्यांना कसली गंमत येते? हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकलेला नाही आणि झुकणारही नाही, असे खा. सुप्रिया सुळे यांनी ठणकाहून सांगितले.