नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात पार पडलेल्या जी 20 (G20 Summit) परिषदेसाठी अनेक राष्ट्रांचे प्रमुख भारतात आले होते. ही परिषद निर्विघ्नपणे पार पडावी याकरता दिल्ली पोलिसांनी अहोरात्र कष्ट घेतले. प्रत्यक्ष परिषदेचा कालावधी आणि त्याच्या अगोदर जवळपास महिनाभर त्यांनी पूर्णत: या एकाच विषयाला वाहून घेतले होते. सगळीकडे त्यांचा खडा पहारा आणि चोख बंदोबस्त होता. आता परिषद पार पडली असून तिच्या यशस्वीतेबद्दल दिल्ली पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) पोलिसांसमवेत आता डिनर करणार आहेत.
अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, युरोपीय संघाच्या नेत्यांसह 30 देशांचे प्रमुख दिल्लीत आले होते. याखेरिज 14 आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींचाही परिषदेत सहभाग होता. ही सगळी व्हीव्हीआयपी मंडळी भारतात आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचे मोठे आव्हानच भारतातील यंत्रणांवर होते.
ती जबाबदारी पार पाडण्याची अत्यंत जोखमीची जबाबदारी दिल्ली पोलिसांवरही होती. परिषदेच्या सुरक्षिततेसाठी 50 हजार पेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले होते. श्वान पथक, तसेच अश्वदलाच्या पथकाचाही विशेष करून समावेश करण्यात आला होता.
हे सगळे मनासारखे झाले आणि कुठे गालबोट न लागल्यामुळे पोलिस दलातही उत्साहाचे वातावरण आहे. परिषदेच्या काळात ज्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यांची एक यादी दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय आरोरा यांच्याकडून तयार केली जाते आहे. त्या अधिकाऱ्यांकडून भविष्यातील दृष्टीकोनातून काही सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. येत्या 16 सप्टेंबर रोजी त्यांच्यासाठी एका विशेष रात्री भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मोदीही त्यात सहभागी होणार आहेत.