मुंबई – दोन दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक बरेच कमी झाले होते. त्यामुळे काही गुंतवणूकदारांनी बॅंकिंग, तेल आणि नैसर्गिक वायू आणि ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी केल्यामुळे सोमवारी शेअर बाजाराचे निर्देशांक जवळजवळ एक टक्क्याने वाढले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 468 अंकांनी वाढून 61,806 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 151 अंकांनी म्हणजे 0.83 टक्क्यांनी वाढून 18,420 अंकावर बंद झाला.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 1,975 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
गेल्या महिन्यात भारतीय शेअर बाजारात या गुंवणूकदारांनी 36, 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र काही दिवसापासून हे गुंतवणूकदार शेअर बाजारात विक्री करीत असल्याचे वातावरण आहे. तरीही डिसेंबर महिन्यात या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात आतापर्यंत 10,555 कोटी रुपयांची गुंतवणूक गेले आहे.
महिंद्रा, पावर ग्रीड, भारती एअरटेल, बजाज फिन्सर्व, एचडीएफसी, मारुती, आयटीसी, टायटन, नेस्ले, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मात्र टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, टाटा मोटर्स, इंडसइंड बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
दक्षिण कोरिया, जपान, चीन, हॉंगकॉंग, अमेरिका येथील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होऊनही भारतीय शेअर बाजारात मात्र गुंतवणूकदारांनी बरीच खरेदी केली असल्याचे दिसून आले.