प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 6 –प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करताना छोट्या व्यावसायिकांवर, किरकोळ विक्रेत्यांवर थेट कठोर कारवाई करू नका. त्याआधी जनजागृती करावी, अशी मागणी विविध व्यावसायिक संघटनांच्या वतीने करण्यात आली.
पर्यावरणास हानिकारक ठरणाऱ्या एकदा वापरायच्या प्लॅस्टिकवर केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने बंदी घातली आहे. याबाबत शहरातील व्यावसायिक संघटना तसेच प्लॅस्टिक उत्पादकांना माहिती देण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रशासनाने बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त माधव जगताप, आशा राऊत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे, प्रताप जगताप यांच्यासह महाराष्ट्र प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, व्यापारी संघटना, बेकरी, कन्फेक्शनरी, स्टेशनरी, कापड विक्रेते, भाजीपाला विक्रेते, मिठाई विक्रेते, कटलरी, हॉटेल, कॅटरिंग व इतर व्यावसायिक प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करताना ब्रॅड ओनर व आयतदारांवरही जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे सुचविले. प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृतीपर कार्यक्रम, कापडी पिशव्यांसाठी बायबॅक यंत्रणा राबविणे असे उपक्रम राबविण्यात येतील असे आश्वासन दिले.