- पाच रिक्षा संघटनांचा विरोध : रिक्षाचालक अडचणीत असल्याचे दिले निवेदन
पिंपरी – गुरुवापासून शहरात मीटरप्रमाणेच रिक्षा चालविण्याच्या उपक्रमास सुरुवात झाली. एका रिक्षा संघटनेने या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात हिस्साही घेतला. परंतु दुसऱ्याच दिवशी शहरातील पाच रिक्षा संघटनांनी ही योग्य वेळ नसल्याचे सांगत मीटर ला विरोध दर्शविला आहे.
वाहतूक पोलिसांनी केवळ एकाच संघटनेला विश्वासात घेऊन शहरात चुकीच्या वेळी रिक्षा मीटर सक्ती लागू केली आहे. आमचा रिक्षा मीटरला विरोध नाही पण रिक्षा चालक संकटात असताना ही वेळ सक्तीची नाही, असे म्हणत पाच संघटनांनी या सक्तीला विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन पाच संघटनानी वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त श्रीकांत डिसले यांना गुरुवारी (दि. 21) दिले आहे.
यावेळी मानव कांबळे, काशिनाथ नखाते, अशोक मिर्गे, नितीन पवार, काशिनाथ शेलार, संजय गाढवे, गिरीष साबळे, नितीन राजू पवार, प्रदीप पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रिक्षाचे मीटर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी डाऊन केले. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे उपस्थित होते. आयुक्तांनी मीटर डाऊन करीत एकीकडे रिक्षा मीटर सक्तीची घोषणा केली. तर दुसरीकडे रिक्षा पंचायत, महाराष्ट्र श्रमिक रिक्षा सेना, क्राती रिक्षा सेना, हिंद ऑटो रिक्षा संघटना, महामानव एक्सप्रेस रिक्षा संघटना या पाच संघटनांनी वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त श्रीकांत डिसले यांची भेट घेतली. करोनाच्या काळात रिक्षा व्यवसाय ठप्प झाला होता. अद्यापही रिक्षा व्यवसाय रूळावर आलेला नाही. अशावेळी रिक्षांना मीटर सक्ती लागू करणे योग्य नाही, असे मत मांडले.
शहरात मीटर सक्ती लागू करण्यासाठी सर्व संघटनांची बैठक पोलिसांनी घेणे आवश्यक होते. रिक्षा चालकांच्या अडी-अडचणी जाणून घेणे आवश्यक होते. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई केली. त्याला आम्ही विरोध केला नाही. मात्र मीटर सक्तीबाबत केवळ एका संघटनेला पोलिसांनी विश्वास घेतले. मीटर सक्तीला आमचा विरोध नाही. मात्र सध्याचे वातावरण पाहता ही वेळ योग्य नसल्याचे या पाचही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.