पिंपळे गुरव – नवी सांगवी येथील फेमस चौकातील स्वामी विवेकानंदनगरमध्ये गेली काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तर काही भागामध्ये मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने प्रशासनाच्या दुजाभावाच्या कृत्यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी सांगवी परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्यांकडे तक्रार केल्यानंतर कर्मचार्यांनी वरूनच पाणी पुरवठा कमी होत असल्याचे सांगितले. परंतु नवी सांगवी भागात काही ठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा होतो तर काही भागात विस्कळीत आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनाविषया प्रश्न उपस्थित केला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांना याबाबत प्रश्न विचारला असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.
पिंपरी चिंचवड शहराला काही वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यात देखील पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पूर्वी पाणीपुरवठा सुरळीत आणि पुरेशा दाबाने होत होता. परंतु मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने महिला वर्गाचे पाण्यासाठी हाल होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.