पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर आणि उपनगरांमधील विविध भागांमध्ये पदपथांवर वाहने पार्क करण्यात आली असून, वाहने पदपथावर आणि नागरिक रस्त्यावर अशी स्थिती आहे. त्यामुळे पदपथ नक्की कोणासाठी असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहेत.
पिंपरी चिंचवड शहराचा विस्तार वाढत असतानाच वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी पार्किंगचा प्रश्न उद्भवत असून नागरिक जेथे जागा मिळेल, तेथे वाहने पार्क करतात. त्यात रस्त्याच्या कडेला असेलेल्या पदपथांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे नागरिकांना अनेकदा पदपथ सोडून रस्त्यावर जीव मुठीत धरून पायी चालावे लागते. वाहने पार्किंग, दुकानांचे फलक, विक्रीसाठी आणलेल्या विविध वस्तू, ज्यूस सेंटर, स्नॅक्स सेंटर, वडापाव गाड्यांची अतिक्रमणे.नागरिकांना रस्ताच उरत नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
रावेत, किवळे रावेतला ठिकठिकाणी पदपथावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून, चालणे अवघड झाले आहे. रावेतमध्ये भोंडवे कॉर्नरला पालिकेने नागरिकांना चालण्यासाठी पदपथ तसेच सायकल ट्रॅक बांधला आहे. मात्र, सर्वच ठिकाणी विविध प्रकारची अतिक्रमणे तसेच वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय रहात नाही. रहाटणी काळेवाडी, रहाटणी व पिंपळे सौदागर परिसरातील विविध प्रमुख रस्त्यांवरील पदपथ मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाने व्यापले आहे. विशेष म्हणजे हे पदपथ पार्किंगसाठी सर्रास वापर होतो. त्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागते.
परिणामी पादचाऱ्याचे छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. वाकड, थेरगाव, चिखली, आकुर्डी, निगडी परिसरातील पदपथांची हीच स्थिती आहे. सांगवी येथील पदपथांवर फळ विक्रेते, भाजी विक्रेते, भंगारवाले आदी व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. जुनी सागंवी, नवी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरवमधील पदपथ नक्की कोणासाठी पादचाऱ्यांसाठी की विक्रेत्यांसाठी असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. भोसरी येथील विविध रस्त्यावरील पदपथावर हातगाडीवाले, पथारीवाले, दुकानधारकांनी अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना मुख्य रस्त्याने जीव मुठीत धरून चालावे लागते. त्यामुळे पदपथ हे पादचाऱ्यांसाठी खुले करण्याची मागणी पादचाऱ्यांमधून होत आहे.
स्मार्ट पदपथ अतिक्रमणांसाठी पर्वणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेने अर्बन सिटीअंतर्गत भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामाअंतर्गत पदपथांची रुंदीही वाढवली आहे. मात्र, या पदपथावरही अतिक्रमण होऊ लागल्याने पदपथाच्या मूळ हेतूलाच बाधा पोचत आहे. त्यामुळे या विस्तारित पदपथांची निर्मिती अतिक्रमण करणाऱ्यांना पर्वणी ठरत आहे.