पिंपरी – शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर गुन्हेगारी कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र गुन्हेगारी कमी होण्याऐवजी भुरटी भाईगिरी आणि चोऱ्यामाऱ्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. मागील पाच वर्षांत शहरात 1802 घरफोड्या झाल्या आहेत. त्यातील चालू वर्षात 431 घरफोड्या झालेल्या आहेत. विशेष म्हणजे यावर्षीच्या 68 टक्के घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा पोलिसांना मागमूसही लागलेला नाही.
स्मार्ट सिटीची स्मार्ट पोलिसिंग असे बिरुद अनेकदा पोलीस मिरवतात. मात्र त्या स्मार्टगिरीत भुरटे चोर मात्र पोलिसांच्या हाती लागत नाहीत. चालू वर्षात जानेवारी ते 20 डिसेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालयाच्या हद्दीत 431 घरफोड्या झाल्या. त्यातील 50 पेक्षा अधिक घरफोड्या दिवसा झालेल्या आहेत. नागरिकांचा राबता, उजेड असताना स्मार्ट सिटीतले चोरटे स्मार्ट पद्धतीने घरफोडी करू लागले आहेत.
चिखली पोलिसांनी नुकतेच एका महिलेला पकडले. ही महिला दिवसा घरांची रेकी करून दिवसाच घरफोड्या करीत असे. रात्री तिला तिच्या लहान बाळाजवळ थांबावे लागत असल्याने ती दिवसा चोऱ्या करीत असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे आता चोरटे देखील कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून गुन्हे करू लागले असल्याची चर्चा आहे. मागील पाच वर्षात सर्वाधिक घरफोड्या सन 2022 या वर्षात झाल्या आहेत.
एखादा चोर अथवा टोळी पकडल्यानंतर त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होतात. त्यामुळे घरफोडी सारख्या गुन्ह्यांचे उघड होण्याचे प्रमाण कमी असते, असे कारण पोलीस देतात. मात्र चोरी करणाऱ्या टोळ्या देखील पोलिसांच्या हाती सहजासहजी लागत नाहीत.
सोशल मीडियावरील स्टेटसमुळे चोरांना निमंत्रण
अनेकजण गावी जाताना अथवा कुठे फिरायला गेल्यानंतर लगेच स्टेट्स अपडेट करतात. मोठ्या आनंदाने तेथील फोटो सोशल मीडियावर अपलोड केले जातात. अशा प्रकारतिथल्या घडामोडींचे फोटो आपल्या सोशल मीडियावर स्टेटसला ठेवतात. याच स्टेटसवर चोरांचे लक्ष असते. चोरटे देखील त्या स्टेटसला, पोस्टला लाईक करतात आणि संधी साधून बंद घरे फोडतात. चोरांनी प्रत्यक्ष जाऊन रेकी करण्यापेक्षा सोशल मीडियावर लक्ष ठेऊन सावज शोधल्याच्या देखील शहरात घटना घडल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील स्टेटस, पोस्ट हे देखील घरफोडीसाठी महत्वाचे कारण ठरत आहे.