अव्वाच्या सव्वा भाडे : दोन किलोमीटरसाठी मोजावी लागतायत 200 रुपये
पिंपरी – टाळेबंदीच्या अटी शिथील केल्याने कामगारवर्गाची पुन्हा पुणे-पिंपरी-चिंचवड शहराकडे धाव घेतली. मात्र नागरिकांना काही रिक्षाचालक अव्वाच्या-सव्वा रिक्षाभाडे घेऊन त्यांची आर्थिक लूट करीत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने रिक्षाचालकांचे अधिक फावले आहे.
कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने 23 मार्चला टाळेबंदीची घोषणा केली. यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात लाखोंच्या संख्येने काम करणाऱ्या चाकरमान्यांनी आपल्या गावचा रस्ता धरला होता. मात्र, आता पाच महिने झाले असून, “अनलॉक 4′ ची सुरुवात झाली असल्याने टाळेबंदीच्या अटी शिथील केल्याने बरेच व्यवसाय व दैनदिन व्यवहार पूर्वपदावर येत आहेत, यामुळे पुन्हा चाकरमान्यांनी शहराचा रस्ता धरला आहे.
राज्यातील विविध भागातून एस. टी व खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून शहरात आलेल्या नागरिकांना आपल्या निवासस्थानी जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करावा लागतो. करोनामुळे शहरात “पीएमपी’च्या 25 टक्केच बसेस सुरू आहेत. याचा फायदा काही रिक्षाचालक घेत आहेत. 2 ते 3 किलोमीटर अंतर प्रवासासाठी अडून 200 ते 300 रुपये घेत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात वल्लभनगर, भोसरी, नाशिकफाटा, चिंचवड, निगडी तर, पुण्यात जुने शिवाजीनगर एस.टी. स्थानक, नवीन वाकडेवाडी एसटी स्थानक, संगमवाडी व अन्य ठिकाणाहून प्रवाशांची सर्रास लूट केली जात आहे. नियमानुसार प्रवासी भाडे घेणे रिक्षाचालकांना बंधनकारक असते; मात्र प्रवाशांची गरज ओळखून अव्वाच्या-सव्वा भाडे “वसूल’ केले जात आहे. यावर नियत्रंण ठेवण्याचे काम वाहतूक पोलिसांचे आहे. मात्र, असे होताना दिसत नसल्याने रिक्षाचालकांचे अधिक फावत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
नियमानुसार प्रवासी भाडे रिक्षाचालकांनी घ्यायला हवे. जर, कुणी आगाऊ भाडे घेत असेल तर प्रवाशांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केल्यास संबधितांवर कारवाई करण्यात येईल. नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा अजून बारकाईने लक्ष ठेवत आहेत.
– श्रीधर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक, पिंपरी-चिंचवड.