पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम पावसाळ्यापासून सुरू आहे. त्या वेळी महापालिका आयुक्तांनी शहरातील 95 टक्के खड्डे बुजविण्यात आले असल्याचा दावा केला होता. परंतु शहरातील कोणत्याही भागात गेले तर रस्त्यांवर खड्डे दिसून येत आहेत. त्यामुळे खड्डे नेमके कोणते बुजविले असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील महत्त्वाचे रस्ते, उपनगरांना जोडणारे रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना, पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहने रस्त्यात अपटल्याने नागरिकांना कंबरदुखी तसेच इतर मणक्याचे आजार उद्भवत आहेत. तसेच वाहनांचे देखील मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे करदात्या नागरिकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा
लागत आहे.
दापोडी येथील महत्त्वाच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. तसेच थेरगाव येथील पदमजी मेल आणि रावेत, आकुर्डी तसेच मोशी, बोऱ्हाडेवाडी, चिखली, मोरेवस्ती, कुदळवाडी, जाधववाडी आदी परिसरातील महत्त्वाच्या रहदारीच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवून घ्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाहनचालकांना अपघाताचा धोका
रात्रीच्या वेळी रस्त्यातील खड्डे दिसून आले नाहीत तर दुचाकींना अपघात घडत आहेत. बऱ्याच वेळा या मार्गाने प्रवास करणारा वाहनचालक नवीन असेल तर त्याला या खड्ड्याची जाणीव नसल्याने गाडी खड्ड्यात अपटत आहे. त्यामुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होत आहे. बहुतांश वेळा स्कूटर खड्ड्यांमध्ये घसरून पडून अपघात घडत आहेत. त्यात बहुतांश वेळा वाहनचालकाच्या पायांना इजा होत आहे. तर काही वेळेस हात पाय मोडत आहे. त्यामुळे काही चूक नसताना नागरिकांना शारीरिक व्याधीला सामोरे जावे लागत आहे.