पिंपरी – दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरातील एक्यूआय ४०० च्या वर गेला होता. हवेतील धूलिकणांमुळे शहरवासीयांना मोकळा श्वास घेणे कठीण जात होते. परिणामी खोकला, सर्दीसारख्या आजारांना निमंत्रण मिळत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि धुक्यामुळे वायू प्रदूषणात घट झाली आहे. त्यातच महापालिकेनेही काही उपाययोजना केल्याने त्यातच महापालिकेनेही काही उपाययोजना केल्याने हवेतील धुलिकणांचे प्रमाण किमान ८० च्या दरम्यान आले आहे.
दिवाळीत शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषित झाली होती. वाढती बांधकामे, विविध विकासकामे, वृक्षतोड आणि विविध कारणांनी गेल्या काही दिवसांत शहरातील प्रदूषणात मोठी वाढ झाली होती. त्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाजविण्यात आलेले फटाके यांतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले होते. परिणामी हवा गुणवता निर्देशांकात धूलिकणांचे प्रमाण ३८० च्या पलिकडे गेले होते. परिणामी अतिप्रदूषित हवेमुळे नागरिकांना विविध आजारांनी घेरले.
संपूर्ण भारतामध्ये दिल्ली शहर सर्वाधिक प्रदूषित असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. आता दिल्लीपाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहराच्या काही भागातील हवा प्रदूषित झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. महापालिकेनेही काही उपायोजना हाती घेतल्या व मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्याला अवकाळी पावसाची साथ मिळाली. परिणामी हवेतील धूलिकण कमी होण्यास मदत झाली. त्यामुळे शहरातील धूलिकणांचे प्रमाण कमी झाले असून प्रदूषणात घट झाल्याचे दिसत आहे. मात्र, हीच परिस्थिती कायम राहण्यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना करण्याची गरज वारंवार अधोरेखित होत आहे.
अवकाळीची कृपा
दिवाळीच्या काळात शहरातील भूमकर चौक, निगडी, भोसरी या भागातील हवेची गुणवत्ता ३०० च्या वर नोंदविली गेली होती. दरम्यान शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. धुकेही मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागातील हवेची गुणवत्ता ८० पर्यंत नोंदविली गेली. परिणामी, प्रदूषणात मोठी घट झाली आहे. परिणामी आजही शहरातील भूमकर चाैक, निगडी, भाेसरी या भागातील हवेची गुणवत्ता (एक्यूआय) ८० ते १४३ पर्यंत नोंदविला आहे.
काही उपायोजना
शहरात वृक्षारोपण करण्याची गरज असून झाडांमुळे बाष्प टिकून राहते. परिणामी हवेतील धूलिकण कमी होण्यास मदत होते. शहरात अनधिकृतपणे होणाऱया बांधकामांवर आळा घालण्याची गरज आहे. वृक्षतोड थांबविली पाहिजे. हवेतील बाष्प टिकून राहण्यासाठी विविध उपायजोना महापालिकेने राबविणे गरजेचे आहे.