पिंपरी – काही मीटरचे अंतर चालणे टाळण्यासाठी अनेक प्रवासी बीआरटी मार्गिकेतून चालत जात आहेत. विशेष म्हणजे दापोडी पोलीस चौकीतील पोलीस कर्मचार्यांच्या साक्षीने हा प्रकार घडत आहे. त्यामुळे याठिकाणी दुभाजकाची उंची वाढविण्याची गरज आहे.
जुन्या पुणे -मुंबई महामार्गावरील सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणाअंतर्गत पीएमपीएमएलच्या वतीने बीआरटीएस कॉरिडॉर विकसित करण्यात आला आहे. मात्र हा मार्ग धोकादायक असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सकडून ऑडिट करून, सुचविलेले बदल अमलात आणून या मार्गावर रखडलेली बीआरटी सुरू झाली आहे. दरम्यान, मेट्रोच्या आगमनाने ठिकठिकाणी बीआरटीला हादरे बसले आहेत. अशापैकी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी येथील बीआरटी मार्गिका प्रवाशांनी स्वत:करिता धोकादायक केली आहे.
निगडीकडून पुण्याच्या दिशेने जाणार्या दापोडी बीआरटी स्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशांना सुखरुपपणे महामार्ग ओलांडता यावा, याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र त्याकरिता सीएमइ समोरच्या भुयारी मार्गातून दापोडीकडे वळण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मात्र, वीस मीटरचे अंतर चालण्याच्या कंटाळा आलेल्या प्रवाशांकडून थेट महामार्ग व बीआरटी मार्ग ओलांडला जात आहे. त्यामुळे प्राणांतिक अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
पादचारी पुलाची गरज
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी येथे चढ-उतार करणार्या पीएमपी प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, याठिकाणी पीएमपी बीआरटी थांबा, मेट्रो स्टेशन व सीएमई गेटसमोर उड्डाणपूल आहेे. या सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आल्या असल्या, तरीदेखील पादचारी पुलाची उणीव भासत आहे.