पिंपरी – दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री जाणवणारी बोचरी थंडी अशा बदलत्या वातावरणामुळे शहरात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये सर्दी, खोकला, तापाने त्रस्त असलेले रुग्ण उपचारांसाठी गर्दी करीत आहेत. डेंग्यूचेही रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला साथरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात सातत्याने बदल होत आहे. दिवसभर उन्हाचा चटका जाणवत असून रात्री थंडीचा कडाका वाढला आहे. हे बदलते वातावरण साथीच्या आजारांना पोषक ठरत आहे. त्यामुळे सध्या शहरात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यांसारख्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
थंडीच्या दिवसांमध्ये आहारात कडधान्य, पालेभाज्या, फळांचा जास्त वापर करावा, तेलकट-तिखट पदार्थांचे सेवन टाळावे, पाणी जास्त प्यावे, शीतपेये टाळावीत, उघड्यावरील फळे, बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत, मद्यपान, धूम्रपान टाळावे, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत, शरीराची हालचाल ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावा, गरम कपडे परिधान करण्यावर भर द्यावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.
लहान मुलांची काळजी घ्या
थंडीचे दिवस सुरू झाल्यापासून लहान मुलांमध्ये विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, दीर्घकाळ खोकला, ताप, उलट्या, जुलाब, त्वचा कोरडी पडणे यांसारखे आजार मुलांमध्ये दिसून येत आहेत. पालकांनी मुलांना वरण-भात, खिचडी, केळी, सफरचंद यांसारख्या पदार्थाचा मुलांच्या आहारामध्ये समावेश करावा, डेंग्युपासून मुलांच्या संरक्षण करण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी, विषाणूजन्य आजारांची लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलांवर उपचार करावेत, असा सल्ला बालरोग तज्ञ देत आहेत.