पिंपरी – पावसाळा सुरू झालेला असतानाही शहरातील काही भागांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. याबाबत अजूनही महापालिकेच्या जनसंवाद सभेत तक्रारी येत आहेत.
पावसाच्या साठलेल्या पाण्याचे नियोजन करावे, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने करावे, शहर परिसरात वेळोवेळी औषध फवारणी करण्यात यावी, बस थाब्यांचे नूतनीकरण करण्यात यावे, खराब झालेल्या ड्रेनेज लाइन्स दुरूस्त करण्यात याव्यात अशा विविध तक्रारी नागरिकांनी सोमवारी (दि.24) झालेल्या जनसंवादमध्ये करण्यात आल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये करण्यात येते. सोमवारी झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण 70 तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे 16,11, 4, 2, 6, 11, 10 आणि 10 तक्रारवजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयाचे स्थलांतर झाले असल्याने नवीन प्रभाग इमारतीत पहिलीच जनसंवाद सभा पार पडली, त्यासही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या मनपा क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेकडून दिल्या गेल्या आहेत.