पिंपरी – मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे मोठ्या धुमधडाक्याचे उद्घाटन झाले. त्यामुळे पिंपरी ते शिवाजीनगरमध्ये मेट्रो सुसाट झाली असून या मार्गाला प्रवाशांचीही मोठी पसंती मिळत आहे. मेट्रोच्या कामासाठी गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून बोपोडीतून पुण्याकडे जाण्यासाठी मुंबई-पुणे महार्गावर बंद आहेत. त्यामुळे वाहन चालकांना खडकी बाजारातून वळसा मारून पुण्याकडे जावे लागत आहे. मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर हा मार्ग इतर वाहनचालकांसाठी हा मोकळा केला जाईल अशी अपेक्षा होती मात्र, मेट्रो सुसाट झाली असताना इतर वाहन धारकांचा वळसा कायमच आहे. कारण मेट्रो स्थानकांची कामे अजूनही सुरू असताना उद्घाटनाची घाई करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी आणि जलद प्रवास होण्यासाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या निधीतून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरासाठी मेट्रो सुरू करण्यात आली आहे. गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत मेट्रोच्या दोन टप्प्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक नागरिक नोकरी, व्यवसाय, विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्याला दररोज ये-जा करतात. मात्र, मेट्रोच्या कामासाठी गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून बोपोडीतून पुण्याकडे जाण्यासाठी मुंबई-पुणे महार्गावर बंद आहेत. त्यामुळे जड वाहनांसह सर्वच वाहन चालकांना खडकी बाजारातून वळसा मारून पुण्याकडे जावे लागत आहे.
खडकी बाजारपेठेत सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे जास्तीचे इंधन आणि वेळ वाया जात आहे. मेट्रो सुसाट झाली असताना इतर वाहन धारकांचा वळसा कधी बंद होणार असा सवाल वाहन धारक उपस्थित करत आहेत. त्यामुळे आता बापोडीपासून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मेट्रो स्टेशन आणि रस्त्याची प्रलंबित कामे जलदगतीने मार्गी लावून मुंबई-पुणे रस्ता वाहन चालकांसाठी खुला करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.