पुणे-सातारा महामार्गावर धोकादायक खड्डे : प्राधिकरणाचे दुर्लक्ष
कापूरहोळ – पुणे-सातारा महामार्गावरील निगडे किकवी सारोळा गावाजवळ महामार्गावर खड्ड्यांचे जाळे तयार झाले असून, वाहने पंक्चर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पुलावर पडलेल्या खड्ड्यात वाहने आदळून या घटना घडल्या आहेत. यामध्ये वाहनधारकांचे मोठे नुकसान होत आहे. भविष्यात भयानक असा अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र, याकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत आहे.
गेल्या दोन दिवसांत सुटीचा दिवस असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात पाचगणी महाबळेश्वर, कोल्हापूर किंवा इतर ठिकाणी फिरायला जातात. सुखाचा प्रवास व्हावा वेळेत पोहोच व्हावे यासाठी, राष्ट्रीय महामार्गचा वापर प्रवाशी करतात आणि टोल भरतात; परंतु पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्गावरून वाहन चालवताना गावचे रस्ते बरे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
महामार्गावर किकवी व धांगवडी गावानजीक पुलावरील पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनांचे टायर फुटत असल्याने पंक्चर व्यवसाय सध्या तेजीत आहे. महामार्गाच्या कडेला असलेल्या पंक्चरवाल्याच्या टपरीबाहेर टायरची मोठी थप्पी लागली आहे. महामार्गावर पडलेले खड्डे भरून घेण्यासाठी आणि रस्ता चांगला करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रस्ते प्राधिकरणच्या विरोधात आंदोलन करणार आहे. धक्कादायक म्हणजे, किकवी व धांगवडीनजीक गेल्या काही दिवसांत अनेक वाहनांचे टायर फुटल्याच्या घटना घडल्या आहेत.
टायर फुटल्याने महामार्गालगत वाहनाच्या रांगादेखील लागतात. या सर्व गोष्टीकडे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. वेळेत आणि सुरक्षित वाहतूक करता येत नाही, पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने अपघात होऊन वाहनाचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच दुचाकी वाहनाचे शॉकऑबसर आणि सायलेन्सर बाद होत आहेत. मोठ्या वाहनाचेही टायर आणि पाटे खराब होत आहेत.
पुणे-सातारा महामार्गावर रस्ता वापरल्याने टोल वसुली केली जाते. मात्र, रस्त्यावर पडलेले खडे, दुभाजकात वाढलेली झाडे, साचलेले पाणी काढले जात नाही. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना या सर्व गोष्टींबद्दल माहिती असूनदेखील याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.
– किशोर बारणे, सामाजिक कार्यकर्ते, निगडे, (ता. भोर)