पिंपरी – माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाली. यामुळे भाजपमधील कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आमदार सुनील शेळके हे देखील याच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. जिल्ह्यातील कोणतीही विकासकामे जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर होतात. भेगडे यांच्या नियुक्तीमुळे मावळ मधील विकासाला वेग येणार की श्रेयवादाच्या लढाईत मावळचा विकास रखडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मावळात भाजपचे वर्चस्व मोडून काढत 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील शेळके मोठ्या मतांनी निवडून आले. राज्यात मविआची सत्ता आल्याने शेळके यांना बळ मिळाले होते, परंतु त्यानंतर राज्यात सत्तांतर घडून आल्याने संजय भेगडे पुन्हा सक्रिय झाले. त्यामुळे 2019 सालापासून मावळात आजी-माजी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता जिल्हा नियोजन समितीमध्ये आजी-माजी आमदार असल्याने तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जिल्हा नियोजन समितीत निवड होताच माजी आमदार भेगडे यांनी विकासकामांवरून आमदार शेळके यांचे नाव न घेता आरोप केले. त्यामुळे आमदार शेळके यांनीही पलटवार करत भेगडे यांचा डाव उलटवून लावला. थेट अडविलेल्या कामांची यादीच जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे. तसेच पुढील काही दिवसांत आपली भूमिका जनतेसमोर जाहीर करु, असे भेगडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुढील काळात आजी-माजी आमदारांचे वाकयुद्ध रंगण्याची शक्यता दिसत आहे.
शंभर कोटींची कामे थांबविली – संजय भेगडे
माजी राज्यमंत्री संजय भेगडे म्हणाले की गेल्या दोन अडीच वर्षात जनतेच्या हिताची आवश्यक असलेली अनेक कामे यापूर्वीच्या राज्य शासनाकडून कामे थांबविण्यात आली आहेत. आगामी काळात या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात सुरू केलेली 100 कोटींपेक्षा जादा रकमेची कामे अडविण्यात आली आहेत. यापूर्वीच्या शासनाने ही कामे अडविली होती, असे म्हणता येईल. तसेच खूप चांगल्या योजना राज्य सरकार नव्याने सुरू करणार आहे. अशा योजना युद्धपातळीवर मावळवासियांसाठी आणणार आहे. गेल्या अडीच वर्षांत मावळ परिसरात जी कामे झाली आहेत. त्यांचा अभ्यास करणार. जी कामे चुकीची झाली आहेत त्यांचा नक्कीच विरोध करणार. आपली भूमिका काही दिवसांतच जनतेला सांगू.
कोणती कामे थांबविली त्याची यादी द्या – सुनील शेळके
माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आमदार सुनील शेळके म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीवर कोणाची निवड झाल्याने काहीही फरक पडणार नाही. मुळातच या समितीवरील निमंत्रित सदस्याला केवळ 25 लाखापर्यंची कामे मंजूर करण्याचा अधिकार आहे. जर कोणी म्हणत असेल की 100 कोटी रुपयांची विकासकामे यापूर्वीच्या सरकारने थांबविली आहेत. तर त्यांनी त्या कामांची यादी द्यावी. थांबलेली विकासकामे करून घेण्याची जबाबदारी माझी आहे. उगाचच कोणी आरोप करू नये. याउलट माजी आमदारांनीच आमची विकासकामे थांबविली आहेत. आमच्या सरकारने कामे थांबविल्याचा आरोप म्हणजे चोरच्या उलट्या बोंबा आहेत, अशी टीकाही शेळके यांनी केली.