पिंपरी – दिल्लीपाठोपाठ पिंपरी चिंचवड शहरातील वायू प्रदूषणामुळे खोकला, सर्दीने नागरिक बेजार झाले असून खोकला महिनाभर रहात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी सर्दी, खोकला, डोकेदुखी, श्वसनाच्या विकारांनी नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता गेल्या महिन्यापासून खराब होताना दिसून येत आहे. शहरातील वाढते प्रदूषण, बांधकामाचे धुळीकण, काही ठिकाणी जाळला जाणारा कचरा आदी कारणांनी हवा प्रदूषित होत आहे.
नुकताच दिवाळीचा सण झाला. त्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके वाजविण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले. दिल्लीपाठोपाठ पिंपरी चिंचवड शहराने नंबर लावत प्रदूषित दिवाळीची नोंद केली. शहरातील हवेची गुणवत्ता लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्यादिवशी अतिखराब गटात गेली होती. त्यामुळे दिवाळी आणि त्यानंतरच्या काळात अनेकजण आजारी पडत आहेत. घसा खवखवणे, खोकला, सर्दी, नाक चोंदणे, पाणी गळणे असे त्रास अनेकांना सुरू झाले. या त्रासापासून मुक्ती मिळावी म्हणून अनेकांनी खासगी, सरकारी दवाखाने गाठले. मात्र, गेल्या गेल्या पंधरा दिवसांपासून होत असलेला त्रास थांबत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.
फटाक्यांच्या धुरामुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना न्यूमोनियासारख्या आजारांनी ग्रासल्याने त्यांना वारंवार दावाखान्याच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. प्रदूषणामुळे विषाणूजन्य आजारात मोठी वाढ झाली आहे. एन्फ्लुएन्झासारखे आजार वाढले आहेत. यात खोकला दोन ते तीन आठवडे राहतो आहे. व्यवस्थित उपचार घेतले तर तो बरा होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
ही काळजी घ्या
गर्दीच्या ठिकाणी गरज नसल्याच जाऊ नये.
गरज असल्यास गर्दीच्या ठिकाणी मास्क घालूनच जावे.
गरम पाणी, प्यावे.
ताजे अन्न खावे.
सुदृढ आरोग्यासाठी ठोस उपायजोनेची गरज
महापालिकेच्या वतीने प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. वायूप्रदूषण नियंत्रक पथकाकडून दंड वसूल केला जात आहे. त्यात बेकरी, हॉटेल यांचा समावेश आहे. मात्र, अशा पद्धतीने प्रदूषण होणार नाही, यावर ठोस उपायोजनेची गरज आहे. शहराचे व नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ठोस पावले उचलून केवळ दंड वसूल न करता पुन्हा अशा पद्धतीने प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे.