दोन उपमुख्यमंत्री निवडीचा पॅटर्न आता ग्रामपंचायतीत
मंचर/पारगाव शिंगवे – जारकरवाडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीला दोन उपसरपंच लाभल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. राज्याच्या राजकारणात दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत, त्यामुळे त्याचा राजकारणाचा आदर्श घेऊन आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी ग्रामपंचायतीत दोन उपसरपंच असावे, अशी मागणी सदस्यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पत्रक देखील काढले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, 23 रोजी जारकरवाडीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीबाबत तरतुदीनुसार सरपंच प्रतीक्षा बढेकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. मी एसटी प्रवर्गातील सरपंचपदी असल्याने आणि गावच्या लोकसंखेच्या व गावाच्या विस्ताराचा विचार करता ग्रामपंचायत जारकरवाडीकरिता दोन उपसरपंचांची नेमणूक करण्याची सर्व परिस्थिती पाहता गरज वाटत आहे, असे बढेकर यांनी सांगितले.
ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री कार्यभार स्वीकारतात, त्याचप्रमाणे मी माझ्या जारकरवाडीमध्ये माझ्या अध्यक्षतेखाली सदस्यांच्या विचाराने कौसल्या भोजणे (प्रभाग 5) यांची उपसरपंचपदी नियमानुसार निवड झाली, त्याचवेळीस सचिन टाव्हरे (प्रभाग 1) याची उपसरपंच म्हणून सदस्यांच्या सह्यानिशी माझ्या अध्यक्षतेखाली निवड करत आहे.
दोन उपसरपंचांसाठी परवानगी द्या
जारकरवाडी ग्रामपंचायतीसाठी दोन उपसरपंचांची निवड ग्रामपंचायत अधिनियमानुसार आहे. एका उपसरपंचाची निवड सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी ठरावाद्वारे केली, तर दुसऱ्या उपसरपंचाची निवड दुसऱ्या. उपसरपंचांच्या या निवडीला मान्यता द्यावी, अशी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकऱ्यांकडे लेखी मागणी केली आहे. निवडणुक बिनविरोध पार पडली होती, तर जनतेतून निवडण्यात येणारा सरपंचही बिनविरोध निवडला होता आणि आता दोन्ही उपसरपंचही बिनविरोध निवडण्यात आले.