पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात ठिकठिकाणी स्मार्ट पदपथ निर्माण केले आहेत. या पदपथाची रुंदी वाढविल्याने मुख्य रस्ते अरुंद झाले आहेत. परंतु हे पदपथ नेमके पादचाऱ्यांसाठी की वाहचालक, व्यावसायिकांसाठी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. आयुक्त साहेब शहरातील स्मार्ट पदपथ नेकमे कोणासाठी असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून जुने पदपथ उखडून त्या जागी नवीन विस्तृत पदपथ निर्माण केले आहेत. हे पदपथ करण्यासाठी सर्वसामान्यांच्या करातून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. परंतु हे पदपथ ज्यांच्यासाठी बांधले तेच रस्त्यावर आल्याने महापालिकेचा उद्देश सफल होताना दिसून येत नाही. आज शहरातील विस्तृत पदपथांमुळे शहरातील व्यावसायिक, पथारी, टपरीवाले यांना बिनधास्तपणे उद्योग सुरू करण्यासाठी अनधिकृतपणे हक्काची जागा मिळाली आहे. शहरातील बहुतांश पदपथांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ज्या पादचाऱ्यांची सुरक्षा व्हावी, त्यांना चालताना अडचणी येऊ नयेत यासाठी हे पदपथ बांधले तेच पादचारी मुख्य रस्त्याने जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
महापालिकेच्या शेजारी अहिल्यादेवी होळकर चौक आहे. या चौकात मेट्रो स्टेशन आणि पीएमपी बस स्थानक असल्याने मोठ्या प्रमाणावर पादचाऱ्यांची वर्दळ असते. तसेच शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या पिंपरीगावात जाण्यासाठी मुख्य मार्ग आहे. तसेच शहरातील महत्त्वाचे शासकीय कार्यलय म्हणजे महापालिका येथेच आहे. तसेच सोने, कपडे, गाड्या, बॅंक आदी कार्यालये, गोदामे, शोरूम येथे असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आणि वाहनचालकांची गर्दी येथे पाहण्यास मिळते. महापालिकेने अहिल्यादेवी होळकर चौकात चिखली ते पिंपरी मार्गावर स्मार्ट पदपथ निर्माण केले आहेत. तेथे चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी पदपथाच्या बाजूने झाडे लावली आहेत. त्यांची निगा देखील महापालिकेच्या वतीने राखली जात आहे. परंतु बहुतांश वाहनचालक या पदपथांवर आपली वाहने झाडांची, फुलझाडांचा विचार न करता बिनधिक्कतपणे पार्क करत आहेत. या वाहनांच्या टायरखाली झाडे मोडून पडत आहेत. त्यामुळे महापालिकेने राबविलेल्या संकल्पनेला काही अर्थ आहे का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. अनधिकृत वाहन पार्किंगमुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच केएसबी चौक ते शाहूनगर रस्त्यावरील पदपथाचा वापर देखील वाहन पार्किंगसाठी होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाने यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.
वाहतूक विभागाचा कारवाईकडे कानाडोळा
अहिल्यादेवी चौकात कायम वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियमन करत असतात. त्यांच्या समोर चार चाकी वाहनचालक वाहने पदपथावर पार्क करतात. परंतु ते या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे चिखलीकडून पिंपरीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनतळ निर्माण झाले आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या आडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात वाहतूक पोलीस धन्यता मानताना दिसून येत आहेत. येथील वाहनांवर नेमकी कारवाई का होत नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.