पिंपरी – दीड वर्षांनंतर शाळांचा परिसर विद्यार्थ्यांच्या किलकिलाटाने गजबजला. सोमवारपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. राज्यात सर्व ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने व करोना बाधितांची संख्या घटल्याने शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. पहिल्याच दिवशी सुमारे 50 टक्के विद्यार्थी शाळेत उपस्थित होते.
शिक्षकांनी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळांनी सुरक्षेला प्राधान्य देत सुरक्षेचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांना एका बाकावर एकाला बसविले होते. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी तर काही शाळांमध्ये जास्त दिसून आली. नियमानुसार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण आणि सुरक्षा, स्वच्छता, शारीरिक अंतर, तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर, ऑक्सिमीटर आदी तयारी केली होती.
महापालिकेच्या माध्यमिकच्या सर्व 18 शाळा आज सुरू करण्यात आल्या. यावेळी शंभर टक्के शिक्षकांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना फूल देऊन, स्वागत गीत म्हणून वाद्याच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
श्री फत्तेचंद जैन विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. काही विद्यार्थ्यांना पुस्तकेही देण्यात आली.
या वेळी प्राचार्या सुनीता नवले, उपमुख्याध्यापिका मनीषा जैन, सुभाष देवकाते, संतोष शिरसाठ, अंजू सोनवणे आदी उपस्थित होते. आकुर्डी येथील श्री म्हाळसकांत विद्यालयात ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी
निगडी येथील मॉर्डन विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांचे सनईच्या सुरात व ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. आकर्षक रांगोळी, फुगे, फुलांची सजावट करण्यात आली होती.
शाळा समितीचे अध्यक्ष ऍड. चिंतामणी घाटे, प्रमुख्याध्यापिका मृगजा कुलकर्णी, संस्था सदस्य राजीव कुटे, प्राचार्य प्रकाश पाबळे, पर्यवेक्षिका वर्षा पाचारणे व शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य प्रकाश पाबळे यांनी मार्गदर्शन केले.