प्रशासनाचा अजब कारभार : बिजलीनगर भागात रात्री पाणीपुरवठा
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील बिजलीनगर भागामध्ये गेल्या एक वर्षांपासून अवेळी पाणीपुरवठा होत आहे. बिजलीनगरमधील शाहू उद्यान परिसरामध्ये रात्री पाणी येते. याबाबत तेथील नागरिकांनी वारंवार आयुक्त व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र त्यांची कोणीही दखल घेत नसल्याने पाणीपुरवठा विभागातील निष्क्रिय अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
बिजलीनगर येथील शाहू उद्यान परिसर व गिरीराज हाऊसिंग सोसायटीमध्ये गेल्या एक वर्षांपासून अवेळी पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्याची वेळ ही रात्रीची असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. रात्री बारा ते पहाटे 2 वाजेपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता तसेच सर्वे न करता प्रशासनाने बदल केला आहे. या भागामध्ये बैठी घरे अत्यंत कमी असून इमारतींचे प्रमाण जास्त आहे.
रात्री होणारा पाणीपुरवठा हा सुरूवातीला अत्यंत कमी दाबाने होत असल्याने इमारतीमध्ये वरील मजल्यांवरील नागरिकांच्या घऱी पाणी रात्री उशिरा पोहचते. यामुळे नागरिकांना रात्री उशिरापर्यंत जागावे लागत आहे. याचा विपरीत परिणाम तेथील नागरिकांच्या दिनचर्येवर होत आहे. दिवसभर नागरिक कामानिमित्त घराबाहेर असतात. सायंकाळी किंवा सकाळी पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे.
मात्र रात्री झोपल्यावर त्याठिकाणी पाणीपुरवठा होतो. याठिकाणची घऱे 25 वर्ष जुनी असल्याने तेथील पाण्याच्या टाक्यांची रचना त्यावेळच्या पाणी पुरवठ्याला योग्य अशी केलेली आहे. मात्र आता प्रशासनाने केलेल्या बदलामुळे त्याठिकाणी पाणी साठविणे मुश्किल झाले आहे. परिणामी तेथील नागरिकांना महापालिकेच्या या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे हाल
बिजलीनगरमधील गिरिराज हाऊसिंग सोसायटीमध्ये 18 इमारती आहेत. याठिकाणी 350 फ्लॅट असून सुमारे 2 हजार नागरिकांची वस्ती आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांना रात्री नियमितपणे औषधे खाऊन वेळेत झोपावे लागते. तसेच याठिकाणी कामगारवर्गही मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना सकाळी लवकर उठावे लागते. मात्र पाणीपुरवठा उशिरा होत असल्याने त्यांना जागावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्य बिघडू लागले आहे.
गेल्या एक वर्षांपासून रात्री-अपरात्री पाणीपुरवठा केला जातो. सोसायटीमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक व कामगार आहेत त्यांना रात्री पाणी भरणे शक्य होत नाही. रात्र जागून काढावी लागते. त्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. याबाबत पालिका प्रशासनाला वारंवार कळविले आहे.
मात्र प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे.
– प्रशांत भागवत, नागरिक
सगळ्यांना सकाळी किंवा संध्याकाळी पाणी लागते. जिथे झोपडपटटी आहे तिथे पाणी सकाळी द्यावे लागते. गिरिराज सोसायटीमध्ये रात्री पाणी देतो. कारण त्यांच्याकडे पाणी साठविण्याची सोय आहे. हा नियोजनाचा भाग आहे. त्यामुळे पाण्याची वेळ बदलणार नाही. त्यांनी दिलेले निवेदन मी बघितले नाही.
– रामदास तांबे, पाणीपुरवठा अधिकारी