पिंपरी – एरव्ही उन्हाळ्याच्या सुरुवातीला नदीत जलपर्णी जमा होते. परंतु वाढत्या नदी प्रदूषणामुळे यंदाही हिवाळ्याच्या सुरुवातीलाच जलपर्णीने नदीपात्र व्यापले आहे. यंदा जलपर्णी काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने तीन महिने अगोदरपासूनच सुरुवात केली आहे. दापोडी येथील हॅरीस ब्रिजनजीक जेसीबीच्या सहाय्याने जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
जलपर्णीमुळे शहरातील नद्या प्रदूषित झाल्या असून ही जलपर्णी काढण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे. दापोडी येथे नदीतील जलपर्णी काढण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून जलपर्णीचा विषय गंभीर झाला आहे. जलपर्णी काढण्यासाठी काही वर्षांपूर्वी महापालिकेने मशीन खरेदी केली होती; मात्र या मशीनचा उपयोग झाला नाही. या मशीनच्या सहाय्याने जलपर्णी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो प्रयत्न फसला. त्यानंतर आता ठेकेदारामार्फतच जेसीबीने जलपर्णी काढली जात आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीला निविदा प्रक्रिया राबवून जलपर्णी काढण्याची पद्धत आहे. तर पावसाळ्यात पूर आल्यानंतर नदीपात्रातील जलपर्णी वाहून जात असते, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया राबवून देण्यात आलेल्या ठेक्याचा फारसा उपयोग होत असल्याचे चित्र आहे. यंदा डिसेंबरमध्येच मुळा-मुठा नदी पात्रातील जलपर्णी काढण्यात येत आहे. जलपर्णी काढल्यामुळे नदीतील प्रदूषण कमी होऊन डासांची पैदास होण्यास आळा बसेल. परिणामी शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. तसेच जलीय जीवनही सुरक्षित राहिल.
कायमस्वरुपी उपाययोजनेची मागणी
दरवर्षी शहरातील नद्यांमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात होते. महापालिका प्रशासनाकडून याबाबत त्वरित उपाययोजना केल्या जात नाहीत. याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे. उन्हाळ्यात जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले जाते. पावसाळा संपल्यानंतर त्वरित यावर उपाययोजना करून जलपर्णी होऊ नये म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. हिवाळ्यात जलपर्णीचे प्रमाण कमी असते. त्या वेळेसच जलपर्णी हटविली पाहिजे, अशी मागणी होत आहे.