पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता पीएचडीसाठी कोणालाही मार्गदर्शक (गाइड) होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यापीठाने गाइड होण्यासाठीची अध्यापन अनुभवाची अट रद्द केल्याने पीएचडी अभ्यासक्रमांसाठी नवे युवा मार्गदर्शक तयार होणार आहेत. त्याबाबत विद्यापीठाकडून कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएचडी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गाइड म्हणून मान्यता मिळण्यासाठी अध्यापनाच्या अनुभवाची कोणतीही अट घातलेली नाही. मात्र, पुणे विद्यापीठाने पीएचडी झाल्यापासून तीन वर्षे शैक्षणिक अनुभव किंवा नियुक्तीच्या वेळी पीएचडी असल्यास पाच वर्षांच्या शैक्षणिक अनुभवाची अट घातली आहे. “यूजीसी’ने पीएचडीच्या गाइडसाठी अट रद्द केली; मात्र याउलट पुणे विद्यापीठाकडून कार्यवाही सुरू असल्याची टीका होऊ लागली. त्यानंतर यूजीसीच्या निर्णयानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेश तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिले होते.
दरम्यान, पीएचडीप्राप्त सहायक प्राध्यापकांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्याचा ठराव विद्यापीठाने मंजूर केला. त्यामध्ये कोणतीही अनुभवाची अट टाकली नाही. मात्र, शैक्षणिक विभागाने नियमावली प्रसिद्ध करताना सहायक प्राध्यापकाने सेवेत रुजू झाल्यानंतर पीएचडी पूर्ण केल्यास तीन वर्षांचा अनुभव आणि सेवेत रुजू होताना पीएचडी असल्यास पाच वर्षांचा अनुभव पाहिजे, अशी अट घातली आहे. या अटीमुळे पीएचडीधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
यासंदर्भात “बेस्टा’ संस्थेमार्फत डॉ. अजय दरेकर आणि डॉ. संतोष पाटील यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर विद्यापीठाला ही अट रद्द करण्याबाबत कार्यवाही सुरू करावी लागली. ही अट रद्द करण्यासंदर्भात विद्यापीठाच्या समितीकडून शहानिशा सुरू आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर अधिकृत निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पीएचडी अट रद्द केल्याचा फायदा
- पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशक्षमतेत वाढ होईल.
- पीएचडी अभ्यासक्रमासाठी नवे मार्गदर्शक उपलब्ध होतील.
- नावीन्यपूर्ण पेटंट विकसित होण्यास मदत होईल.
- सहयोगी प्राध्यापक किंवा प्राध्यापक पदासाठी संधी मिळतील.
विद्यापीठाच्या परिपत्रकाकडे लक्ष
उच्च शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी अभ्यासक्रमांच्या “गाइडशिप’साठी अनुभवाची अट काढून टाकण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली. त्यासाठी समितीमार्फत कार्यवाही सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे. मात्र, त्याबाबत अजूनही परिपत्रक विद्यापीठाकडून प्रसिद्ध करण्यात आले नाही. विद्यापीठाकडून हे परिपत्रक कधी प्रसिद्ध होणार आहे, याकडे संशोधक विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.