औरंगाबाद – केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवर बंदी घातली आहे. त्यानंतर आता पीएफआय संघटनेच्या कार्यालयांना सिल ठोकण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. पीएफआयचे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथील जिन्सी भागातील कार्यालय पोलिसांकडून सिल करण्यात आले आहे.
सील केलेल्या नोटीसवर औरंगाबाद पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांची सही आहे. कार्यालयाला तीन गेट असून तीनही गेटवर सील लावण्यात आले आहे. या कारवाईनंतर पीएफआयच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पीएफआयचे कार्यालय सील करण्याची ही राज्यातील पहिलीच कारवाई आहे.
दरम्यान, पीएफआय संघटनेवर केंद्र सरकारकडून पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. देशविरोधी कारवाया केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. देशविरोधी कट रचल्याचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेच्या शेकडो सदस्यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी वेगवेगळ्या कारवाया करत ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता पीएफआय कार्यालयावर सुद्धा कारवाई करण्यात येत आहे.
औरंगाबादमधून पीएफआयच्या 17 सदस्यांना ताब्यात घेण्यात आले होते. येथून अटक केलेा नासेर शेख हा या संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे.