इस्लमाबाद: हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानात तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकिल नियुक्त करण्यात यावा, यासाठी पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
हेग इथल्या जागतिक न्यायालयाच्या आदेशांनुसार जाधव यांच्यावरील खटल्याची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी पाकिस्तान सरकारने ही याचिका दाखल केली आहे.
प्रांतीय अध्यादेशानुसार विधी आणि न्याय मंत्रालयाच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. “लष्करी न्यायालयाने जाधव यांच्या संदर्भात सुनावलेल्या निकालाचा फेरविचार आणि आढावा घेण्यासाठी हेग आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशांनुसार उच्च न्यायालयाने जाधव यांच्यासाठी वकिलाची नियुक्ती करावी.’ असे या याचिकेमध्ये म्हटले आहे.
दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानने जाधव यांना दूतावासातील अधिकाऱ्यांची भेट घेण्याची तिसऱ्यांदा परवानगी दिली. त्यानंतर लगेचच वकिलाच्या नियुक्तीसाठीची याचिका दाखल करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना पाकिस्तानने जाधव यांच्या भेटीची परवानगी दिली होती. मात्र ही भेट समाधानकारक झाली नाही, असा दावा भारतीय अधिकाऱ्यांनी केला होता.
भेटीच्यावेळी जाधव हे तणावाखाली आढळले, असे भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटले होते. तसेच भेटीच्यावेळी पाकिस्तानी अधिकारी तेथेच उपस्थित राहिले आणि यावेळी झालेले संभाषण रेकॉर्डिंग केले गेल्याने या भेटीमध्ये पारदर्शकता राहिली नव्हती. ही भेट गोपनीय रहावी, अशी विनंती भारताच्यावतीने केली गेल्यावर तिसऱ्यांदा भेटीची परवानगी पाकिस्तानने दिली.