– सागर ननावरे
जुलुमी ब्रिटिश राजवटीच्या जोखंडातून मुक्ती मिळून खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा अविस्मरणीय दिन म्हणजे 15 ऑगस्ट. हा दिन तसे पाहता प्रत्येक देशवासीयांसाठी जणू उत्सवच असतो. हा दिन देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची आठवण करून देतो. या दिनी सर्वांनी एकत्र येत तिरंग्याला दिलेली मानवंदना, सोबत गायलेले राष्ट्रगीत, थोरामोठ्यांचा उत्साह सर्वकाही अद्भुतच.
काल सायंकाळी भाजीपाला खरेदीसाठी बाजारात गेलो होतो. भाजीपाला घेऊन झाला आणि मी घराच्या दिशेने परतू लागलो. तेवढ्यात मला एका किराणा दुकानाच्या बाजूला असणाऱ्या छोट्याशा जागेत दोन तीन मुले काहीतरी कागदकाम करताना दिसली. मी त्यांच्याजवळ गेलो. पाहतो तर कागदी झेंडे बनविण्याचे काम ती मुले करीत होती. मी उत्सुकतेने त्यांना विचारले, काय रे शाळेने घरून झेंडे बनवून आणायला सांगितले आहेत वाटतं. त्यावर त्यातील एकजण लगेच बोलला, “दादा, करोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळेत कशाला झेंडे लागणार आहेत?’
दुसरा त्याचे वाक्य पूर्ण करीत बोलला, “लॉकडाऊनमुळे घरी पैसे कमी पडू लागलेत. त्यामुळे आम्ही हे झेंडे बनवून त्याची विक्री करणार आहोत.’ क्षणभर मी त्यांच्याकडे पाहत राहिलो. आपण असे प्रश्न विचारून त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड तर येत नाही ना, असे मनात आले. आता मात्र मी शाबासकीच्या सुरात त्यांना म्हणालो, “छान काम करीत आहात.
यातून देशभक्तीच्या भावनेतून इतरांना आणि स्वतःला आनंद कसा द्यायचा हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे.’ त्यातील एकजणाने “थॅंक यू’ म्हणत आभार मानले. त्यावर मी त्यांना पुन्हा एक प्रश्न केला. “मित्रांनो, तुम्ही हे छान झेंडे बनवीत आहात हे ठीक आहे. परंतु लॉकडाऊनमुळे शाळा तर भरणार नाही. मग हे तुमचे झेंडे कोण विकत घेणार?’
त्यातल्या एक चुणचुणीत मुलाने उत्तर दिले, “दादा, जरी शाळा बंद असली तरी लोकांचे फिरणे बंद नसणार आणि 15 ऑगस्टला शाळेत कितीजण जातात आणि फिरायला कितीजण जातात हे तुम्हालापण माहीत आहेच की.’
त्याच्या या उत्तराने मीही क्षणभर अवाक् झालो. त्या छोट्या देशभक्तांनी जणू माझे डोळे उघडले होते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वातंत्र्यदिनी एन्जॉय केली जाणारी सुट्टी कशी महत्त्वाची ठरते हे मनात येऊन गेले.
मनात विचारचक्र सुरू झाले. देशाला स्वातंत्र्य मिळून पाऊण शतक ओलांडत आहे. मात्र स्वातंत्र्याच्या नावाखाली सुरू झालेला स्वैराचार विकासापेक्षा दुपटीने वाढत असल्याचे मला जाणवले. अगदी करोना संकटाच्या काळातही स्वार्थासाठी, स्वतःच्या आनंदासाठी समाजाला धोक्यात टाकणारेही आहेत. परिवर्तन म्हणून स्वातंत्र्य हवे होते.
आता तेच स्वातंत्र्य किंबहुना स्वातंत्र्यदिन पर्यटनाचे साधन झाले आहे. ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त होणे हा त्या स्वातंत्र्याचा मुख्य उद्देश होता. आता शासनाने वारंवार सांगूनही जबाबदारपणातून मुक्त होण्याचा अट्टाहास का बरं वाढला असावा?
खूप विचार करायला लावणारे हे मुद्दे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात अधुनिकीकरणाची लाट आली खरी पण स्वातंत्र्याचे स्वैराचारात कधी रूपांतर झाले हे कळलेसुद्धा नाही. आधुनिक विचार म्हणता म्हणता आपण खरंच त्या विचारांचे आहोत का, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. कोविड काळात शासनाचे नियम, सामाजिक आरोग्याप्रती असणारी बांधिलकी खरंच जपली का, हे मोठे प्रश्नचिन्ह आहे.
परंतु असे असले तरी या देशात शांतता, सुव्यवस्था, निकोप स्वास्थ्य आणि धावते अर्थचक्र जपण्यासाठी अनेक देशभक्तांनी योगदान दिले. यात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन, शासकीय कर्मचारी, सेवाभावी संस्था आणि सामाजिक व्यक्तिमत्त्वे यांनी खऱ्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. या कठीण काळात संवेदनशीलतेने आपली जबाबदारी पार पाडत स्वातंत्र्याला साज चढविला किंबहुना आजही चढवित आहेत.
मागील अनेक वर्षांत आपल्या मातृभूमीने, देशाने आपल्याला खूप काही दिले आहे. आता वेळ आहे या देशासाठी आपण काहीतरी करण्याची. स्वातंत्र्याला स्वैराचाराची किनार न देता देशहितासाठी त्याचा वापर करण्याची. सध्या या संकटातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे
आणि शासनाचे नियम पळून व सामाजिक स्वास्थ्य जपून आपल्याला ती पार पाडायची आहे. आपल्या पूर्वजांनी ब्रिटिशांशी दोन हात करून आपल्याला स्वातंत्र्यरूपी आकाश खुले करून दिले. आता त्या स्वातंत्र्याचा अर्थ शतकानुशतके अबाधित राखून वारसा संपन्न करायचा आहे. तोसुद्धा साने गुरुजींच्या ओळींना स्मरून बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो…