– माधुरी तळवलकर
भारतातील अनेकांनी अपरिमित त्याग करून, देहदंड सोसून 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळवले. तेव्हापासून देशाची स्वायत्तता टिकवून ठेवण्यासाठी, देशाचा सन्मान राखण्यासाठी आपले लष्कर सदैव दक्ष अन् प्रयत्नशील राहिले आहे. फक्त सीमांचे रक्षण करणे किंवा घुसखोरांना अटकाव करणे एवढेच काम हे सैनिक करीत नाहीत;
तर अशांत टापूतील, सीमावर्ती भागातील लोकांच्या मनात भारताबद्दल विश्वास निर्माण व्हावा म्हणून त्यांच्याशी सहिष्णुतेने वागण्याचे धोरण आचरतात. तेथील रहिवाशांसाठी अनेक विकास-योजना तसेच कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यासाठी वेगळे मनुष्यबळ वापरले जात नाही. ही सामाजिक कामेही सैनिकच करीत असतात.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तीन चिनी नागरिक खराब वातावरणामध्ये भरकटले व उ. सिक्कीममध्ये चीनच्या सरहद्दीतून भारतात आले. खरे तर चीन आपल्याशी नेहमीच विश्वासघाताने वागला. पण हे रस्ता चुकून आलेले नागरिक होते. शत्रूराष्ट्राचे असूनही त्यांना आपल्या जवानांनी मदत केली. बर्फाळ डोंगराळ प्रदेशात त्यांची काळजी घेतली व त्यांना सन्मानाने परत पाठवले. याबद्दल चिनी लष्कराने भारतीय लष्कराचे आभारही मानले. भारतीय संस्कृतीमध्ये ही सहिष्णुता पुरेपूर मुरलेली आहे.
चीन व पाकिस्तान या दोनही देशांच्या सैन्याचे, घुसखोरी करून भारताच्या कुरापती काढण्याचे उद्योग मधूनमधून चालू असतात. सीमाप्रश्न सोडवण्यापेक्षा तो कायम धगधगत ठेवणे या देशांना अधिक श्रेयस्कर वाटते. त्यामुळे त्यांच्या अंतर्गत समस्यांपासून जनतेचे आणि जगाचे लक्ष दुसरीकडे वळवणे हे त्यांच्या परराष्ट्रनीतीला धरून असावे. प्रत्येक वेळी भारताचे शूरवीर जवान त्यांचा समर्थपणे मुकाबला करतात. कधी प्राणांची आहुती देऊन तर कधी कायमचे अधूपण वाट्याला आले तरी त्याची पर्वा न करता त्यांना धडा शिकवतात.
जम्मू काश्मीर इथले हवामान अत्यंत लहरी. बर्फवृष्टी, वादळे नित्याचीच. भूस्खलन, कडे कोसळणे यांमुळे रस्ते वारंवार दुरुस्त करावे लागतात. अतिउंचीमुळे हवा विरळ. श्वास घेणे मुश्कील. तीस-चाळीस किलोमीटर लांबीचे घाट वीस-पंचवीस वळणे घेत पार करावे लागतात. अशा प्रतिकूल वातावरणात आपले लष्कर माणुसकीची ऊब देण्यासाठी तेथे सज्ज असते. त्या भागात येणाऱ्या पर्यटकांना, स्थानिकांना सर्वतोपरी साह्य करते. काही ठिकाणी गावकऱ्यांनी, भटक्या गुराख्यांनी लहानलहान देवळे केली आहेत. त्यांच्या श्रद्धेचा आदर राखण्यासाठी लष्करी जवान या देवळांची काळजी घेतात. सणासुदीला त्यांची रंगरंगोटी, सजावट करतात.
काही अधिकारी तिथल्या अनाथ मुलांना चक्क स्वतः दत्तक घेतात. त्यांचे पालनपोषण, शिक्षण
स्वतःच्या खर्चाने करतात. अशी मुले मोठ्या अभिमानाने पुढे सैन्यात दाखल होताना दिसतात. एका लहान मुलीच्या खर्चासाठी एक अधिकारी अखेरपर्यंत दरमहा तिला पैसे पाठवीत होते. स्वतःच्या आयुष्याची खात्री नसताना तिच्या आयुष्याची काळजी घ्यायला ते कधीही विसरले नाहीत. आघाडीवर लढणाऱ्या जवानांना वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टरही तेवढेच निधड्या छातीचे असतात.
कारगील युद्धात कॅ. डॉ. आढाव यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर अनेक घायाळ जवानांचे प्राण वाचवले. माझा हात लागेल त्या जवानाला मी मरू देणार नाही, असा त्यांचा निश्चय होता आणि तसेच ते वागले. लष्करी अधिकाऱ्यांच्या सुशिक्षित पत्नी तिथल्या शाळांमधून शिक्षक म्हणून काम करतात. अर्थातच त्यातून परस्परांमध्ये सौहार्दाचे संबंध तयार होत राहतात.
भारतीय लष्कर इतर देशातील लष्कराप्रमाणे फक्त गोळ्या घालून शत्रूला मारण्याचे काम करीत नाही. सीमावर्ती भागातील लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी त्यांनी तिथं अनेक सुधारणा केल्या. तिथल्या जनतेच्या अडचणी समजावून घेत त्या दूर करणं, लोकांना कार्यक्षम बनवणं, सरकारी संस्थांशी स्थानिक जनतेला जोडून घेणं असे अनेक उपक्रम आपले जवान राबवत असतात. “ऑपरेशन सद्भावना’ या नावानं हे उपक्रम चालवले जातात.
नवीन शाळा सुरू करणं, व्यावसायिक प्रशिक्षण देणं, शाळांसाठी लष्कराच्या बस वापरणं… जणू हे आपलं स्वतःचं गाव आहे, या भावनेनं तिथली कामं सैनिक अंगावर घेत असतात. इच्छा असेल त्यांना योगासनं शिकवली जातात. क्रीडागुण हेरून खेळाडू तयार केले जातात. तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरं घेतली जातात. भारतीय लष्करात काश्मिरी विद्यार्थ्यांना सामावून घेता यावं म्हणून, त्यांना एनडीएमध्ये (नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी) प्रवेश मिळण्यासाठी, प्रवेश परीक्षेची त्यांची तयारी करून घेण्यास गेल्याच महिन्यात आपण सुरुवात केली आहे.
जम्मू काश्मीर भागातील स्त्रियांना हस्तकला, शिवणकाम, संगणक इत्यादी प्रशिक्षण देऊन स्वावलंबी होण्यास लष्करातर्फे मदत केली जाते. त्यांचे सणसमारंभ आवर्जून साजरे केले जातात. त्या भागात जनतेसाठी आरोग्यकेंद्रे उभारली आहेत. प्रत्यक्षात ही हॉस्पिटल्स भारतीय सैनिकांसाठी असतात. पण कित्येकदा जवानांपेक्षाही त्याचा लाभ स्थानिकांसाठीच होतो. गुरे राखणाऱ्या मुलांसाठीदेखील वसतिगृहे आहेत. हे सारे कशासाठी?
तर पाकिस्तानच्या चुकीच्या प्रचाराला हे लोक बळी पडू नयेत. आपण भारतात राहतो आणि याच देशाचा आपण महत्त्वाचा घटक आहोत हे इथल्या जनतेच्या लक्षात यावे म्हणून. साहजिकच भारतीय लष्कराचा चांगला अनुभव आल्यावर आता स्थानिक लोक खोट्या प्रचाराला बळी पडत नाहीत. अतिरेक्यांच्या हालचालींविषयी काही गुप्त बातम्या कळल्या तर ते आपणहून येऊन आपल्या सैनिकांना सांगतात.
अर्थात इतके करूनही काही फुटीर मनोवृत्तीचे लोक सैनिकांना त्रास देण्यात, त्यांचा अपमान करण्यात आनंद मानतात. अशा वेळी राग आवरून या सैनिकांना संयमाने वागावे लागते. कधी अशा उपद्रव देणाऱ्यांनाच मदत करण्याची वेळ येते आणि आपले सैनिक मनात कटुता न ठेवता ती करतातही. त्यांच्या मुलांना फिरायला घेऊन जाणं, गाणीगोष्टी शिकवणं अशा गोष्टीही आपले हे जवान चिकाटीनं करीत राहतात. सर्वतोपरी विचार करून देशाचा सन्मान अबाधित ठेवणाऱ्या या पराक्रमी सैनिकांना स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रणाम!