नारायण मेघाजी लोखंडे यांचे मूळ गाव कनेरसर ता. खेड. जि. पुणे. त्यांचे वडील नोकरी-व्यवसायानिमित्त ठाणे येथे गेले होते. 13 ऑगस्ट 1848 रोजी ठाणे येथे नारायण यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण मॅट्रिकपर्यंत पूर्ण झाल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते मुंबईतील भायखळा येथे गेले. त्यांनी प्रथम रेल्वेत क्लार्क म्हणून नोकरी केली, नंतर पोस्टात व गिरणीत स्टोअरकीपर म्हणून काही काळ सेवा केली. त्याबरोबरच वाचन व लेखनाचा छंद त्यांनी जोपासला. 27 ऑक्टोबर 1876 रोजी लोखंडे यांनी लिहिलेल्या पंचदर्पण पुस्तिकेचे प्रकाशन संपन्न झाले.
नारायण यांनी नोकरी करीत असतानाच समाज चळवळीत स्वतःला झोकून दिले. 9 मे 1880 रोजी दीनबंधू या वृत्तपत्राचे संपादक पद स्वीकारले. त्यांनी पत्रकारिता जवळून पाहिली. लोखंडे यांनी सुरुवातीला ब्रिटिशांकडे शुद्रातिशुद्रांच्या मुलांसाठी शिक्षणात स्कॉलरशिपची मागणी केली तसेच पहिला फॅक्टरी ऍक्ट सुधारण्यासाठी त्यांनी लढा दिला. टिळक-आगरकर यांची डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीसाठी लोखंडे यांनी पुढाकार घेतला.
23 सप्टेंबर 1884 रोजी गिरणी कामगारांची पहिली जाहीर सभा चार हजार कामगारांच्या उपस्थितीत सुपारीबाग, परळ येथे घेऊन लोखंडे यांनी कामगार चळवळीचे रणशिंग फुंकले. त्यानंतर बॉम्बे मिल हॅण्ड्स असोसिएशनची स्थापना केली. 15 ऑक्टोबर 1884 रोजी फॅक्टरी कमिशनचे अध्यक्ष डब्ल्यू. बी. मुलक यांना 5500 कामगारांच्या सह्यांचे निवेदन लोखंडे यांनी दिले. कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. लेखनातही सातत्य ठेवले. 1 मे 1887 रोजी सत्यशोधक निबंधमाला व हिंदूधर्माचे खरे ज्ञान या पुस्तिकांचे प्रकाशन केले. ज्योतिबा फुले यांना एक लाख जनसमुदायासमोर महात्मा ही पदवी देण्यासाठी त्यांनी 11 मे 1888 रोजी सभेचे आयोजन केले होते.
केशवपन या प्रथेविरोधात त्यांनी डोंगरी येथे न्हाव्यांची सभा व संप घडवून आणला. रेसकोर्स येथे दहा हजार कामगारांची सभा व त्यात दोन महिला कामगारांना भाषणाची संधी देऊन कामगारलढ्यात अग्रस्थान दिले. 10 जून 1890 रोजी कामगारांना आठ तास काम व रविवारची सुट्टी हे ठराव त्यांनी मंजूर करून घेतले. त्यांना ब्रिटिश सरकारने जस्टीस ऑफ पीस पद बहाल केले. हिंदू-मुस्लीम ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी सहाय्य निधी स्थापन करून शांतता कमिटी, एकोपा मेळावा असे उपक्रम राबविले.
13 ऑगस्ट 1895 रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रिटिश सरकारने त्यांना “रावबहाद्दूर’ हा किताब बहाल केला. 9 फेब्रुवारी 1896 रोजी प्लेगच्या साथीने वयाच्या 48 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 3 मे 2005 रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याहस्ते त्यांच्या पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण झाले. अभिवादन.