जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही अस्तित्वात नाही. जनता भीतीच्या छायेत जगत आहे, असा आरोप त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीमुळे आझाद जम्मू-काश्मीरचा सहा दिवसीय दौरा करू शकले. तो दौरा आटोपून दिल्लीला रवाना होण्याआधी ते जम्मूत पत्रकारांशी बोलत होते. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यामुळे कुणीच आनंदी नाही. केवळ भाजपचे शंभर ते दोनशे सदस्य खुषीत आहेत. काश्मीरमध्ये निराशेचे वातावरण आहे. जम्मूतील लोकही निराश आहेत, असा दावा आझाद यांनी केला. जम्मू-काश्मीरचा दर्जा बदलल्यानंतर तेथील लोकशाही गायब झाली आहे. प्रशासनाची एवढी दहशत मी जगात कुठेच पाहिली नाही. अभिव्यक्ती आणि आंदोलन करण्याच्या स्वातंत्र्याला स्थान उरलेले नाही. आवाज दडपून टाकले जात आहेत. वीज, पाण्यासाठी आंदोलन करण्याचा विषय जरी कुणी काढला; तरी त्याला भारतातील कुठल्या तुरुंगात जाण्याची इच्छा आहे असे विचारले जाते, असा आरोपही त्यांनी केला.