आरबीआयने दिले स्पष्टीकरण
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बॅंका विलनीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांपासून आणखीन नऊ सरकारी बॅंका बंद होणार असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मेसेज केवळ अफवा असून बॅंकांमधील ठेवीदारांचा पैसा सुरक्षित आहे, असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दिले आहे. सरकारी बॅंकांमध्ये भांडवल निर्मिती करुन बॅंका मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे वित्त सचिव राजीव कुमार यांनी सांगितले.
सोशल मीडियावर व्हायरल मेसेजमध्ये नऊ सरकारी बॅंका बंद होणार असल्याचा दावा केला जात आहे. या मेसेजमध्ये कॉर्पोरेशन बॅंक, आयडीबीआय बॅंक, यूको बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आंध्रा बॅंक, इंडियन ओवसीज बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, देना बॅंक आणि युनायटेड बॅंकेच्या नावाचा समावेश आहे.
दरम्यान, मंगळवारी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेवर (पीएमसी) आरबीआयने निर्बंध घातले. यामुळे ग्राहकांना फक्त एक हजार रुपयेच काढण्याची मुभा आहे. बॅंकिंग नियामक कायदा 1949 मधील कलम 35-अ अंतर्गत बॅंकेने ही कारवाई केली. या कारवाईनंतर बॅंकेसमोर ग्राहकांनी पैसे मिळत नसल्याने एकच गोंधळ केला.