नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत 1998 ते 2013 अशी पंधरा वर्षे कॉंग्रेसचे सरकार होते. त्यानंतर पक्षाचा उतरतीचा काळ सुरू झाला. आम आदमी पक्षाचा उदय झाल्यावर तर कॉंग्रेस राजधानीत पुरता भुईसपाट झाला आहे. आप आणि भाजप यांच्यानंतर तिसऱ्या नंबरवर हा पक्ष फेकला गेला. एकेकाळी बहुजन समाज पक्षाची जशी अवस्था दिल्लीत झाली होती. मतदार तर सोडाच पण टीकाकारही त्यांची दखल घेईनासे झाले होते. आज कॉंग्रेसची तीच अवस्था होत चालली असून लोकांना आमच्याकडून काहीच अपेक्षा राहिलेल्या नाहीत हा चिंतेचा विषय असल्याचे दिल्लीतील कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे.
दिल्लीत कॉंग्रेसची सत्ता गेल्यानंतर झालेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत या पक्षाला खातेही उघडता आलेले नाही. आता गेल्याच महिन्यात विधानसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवार प्रेमलता यांना केवळ दोन टक्के मते मिळाली. त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. ना सोशल मीडियावर आम्हाला कोणी ट्रोल करत ना माध्यमे आमची दखल घेत. आमची मतांची टक्केवारी केवळ दोन टक्के झाली आहे, असे या नेत्याने खेदाने सांगितले.
कॉंग्रेसची इतकी वाईट कामगिरी होते आहे हा चिंतेचा विषय आहेच. पण आता नेतेही पक्षात पुन्हा चैतन्य निर्माण होईल यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यामुळे गेल्या काळात कॉंग्रेसला रामराम करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पक्ष जसा जसा दुबळा होतो आहे तशी गळती वाढत चालली आहे. तीनवेळा आमदार पदावर राहीलेले नेतेंही पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे या नेत्याने सांगितले.
कॉंग्रेसने सादर केले दहशतवाद्यांचे भाजपशी संबंध असल्याचे पुरावे
आप आणि भाजपच्या संपर्कात कॉंग्रेसच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार दिल्लीत आता एकही वरिष्ठ नेता पक्षात सक्रिय राहिलेला नाही. नेते एकतर आपच्या किंवा भाजपच्या संपर्कात आहेत. अशी स्थिती राहिली तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतच पक्षाकडे उमेदवार राहणार नाहीत. सगळे सोडून गेलेले असतील. पक्ष सोडून जाणाऱ्यांना थोपवणे, वरिष्ठ नेत्यांना पुन्हा सक्रिय करणे आणि जे अगोदरच गेले आहेत त्यांची घरवापसी करणे व सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी लोकांना संधी देणे आदी बाबी कॉंग्रेसला कराव्या लागतील तरच काही भवितव्य आहे, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, त्यांना थोपवणार कोण आणि सध्या नेतृत्वाच्या पातळीवर जी प्रचंड उदासीनता आहे, मरगळ आहे ती झटकणार कशी हाही मोठा सवाल आहे.
अमरनाथ आपत्तीतील 15 हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले