सुप्रिया सुळे : गंगावळण पर्यटनस्थळांची पाहणी
रेडा – सध्या उजनीच्या पाण्याची अत्यंत प्रदूषित स्थिती सुधारणे हेच प्रशासनापुढील मोठे आव्हान असणार आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात विशेष प्रकल्प राबवला होता. मात्र, फडणवीस सकारने त्याचा फारसा विकास केला नसल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.
इंदापूर तालुक्यातील उजनी गंगावळण या गावी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांच्या पुढाकाराने व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटनस्थळ उभारले जात आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी खासदार सुळे यांनी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सुळे यांनी सर्व परिसर पाहिल्यानंतर बोटीत बसून उजनीमध्ये जलविहार करण्याचा आनंदही लुटला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे सदस्य वैशाली पाटील, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील, महिला तालुकाध्यक्ष छाया पडसळकर, पदाधिकारी उपस्थित होते. खासदार सुळे म्हणाल्या की, पुण्यातून उजनीमध्ये येणारे सांडपाणी यासाठी जॅकवेलचा उपक्रम लवकरच राबवणार आहे.
आता आपले सरकार आल्याने आपण या उपक्रमाला चालना देणार आहे. लवकरच दूषित पाणी थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशीही ग्वाही देत उजनीच्या प्रदूषित पाण्यासाठी महाविकास आघाडी जातीने लक्ष देणार आहे. पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी शासन विशेष प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्रात भाजपची सत्ता असून दिल्लीमधील होणारा प्रकार हा पोलिसांनी केंद्राला रिपोर्ट करून कळविल्यानंतर हे सरकार केवळ निवडणुका आणि इतरत्र चर्चा करण्यात मश्गूल असल्याची टीका त्यांनी केली.