सातारा – ग्रामीण भागातील निराधार, गरीब विद्यार्थ्यांना सायकल, संगणक, दप्तर पुरवून त्यांना आधार देण्याचे काम करत भावी पिढीला इंद्राणी बालन फाउंडेशन ताकद देण्याचे काम करत आहे, असे मत अखिल भारतीय दहशतवादविरोधी मोर्चाचे अध्यक्ष एम. एस. बिट्टा यांनी व्यक्त केले. कोणतीही सेवा मनापासूनच करण्याचे ध्येय घेऊन परिवर्तन सामाजिक संस्था आणि बालन समूह करत असलेले सामाजिक कार्य आदर्शवत आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुणे येथील परिवर्तन सामाजिक संस्था आणि एस. बालन समूह यांच्यावतीने ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरीब व निराधार विद्यार्थ्यांना 600 सायकल, 600 दप्तरांचे वाटप बुधवारी करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बिट्टा बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. श्रीनिवास पाटील होते. व्यासपीठावर शिवाजीराजे भोसले, बालन समुहाचे पुनित बालन, जान्हवी धारीवाल, सारंग पाटील, परिवर्तन संस्थेचे अभिजित घुले, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सासवड येथील जगताप फौंडेशनचे संतोष जगताप, नंदाभाऊ जाधव, भुजंगराव जाधव, बीड येथील बालग्राम सहारा अनाथालय परिवाराचे संचालक संतोष गर्जे, प्रीती गर्जे आदी उपस्थित होते.
बिट्टा म्हणाले, “”हिंदुस्तान अखंड राहण्यासाठी मी जीवाचे रान केले. दहशतवाद्यांनी मला संपवण्यासाठी 14 हल्ले केले. मात्र, मी मरण पत्करेन पण देशाची अखंडता टिकवण्यासाठी कायम पुढे राहणार आहे. सातारा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा असून त्यांना गुरु मानून मी काम करत आहे. छत्रपती संभाजी महाराजांना शेवटच्या दिवसात अखंड यातना देण्यात आल्या. त्यांच्या समाधीवर नतमस्तक होवून माझ्या अश्रूंचा बांध फुटला.
अखंड हिंदुस्तान हे माझे स्वप्न असून दहशतवादी हल्ले झालेतरी मी हार मानली नाही. देशासाठी मरण आले तरी चालेल पण ध्येयापासून मागे हटणार नाही. ध्येय चांगले असेल आणि मन साफ असेल तर कोणत्याही संघर्षाचा सामना करायला कमी पडायचे नाही हा बोध छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून आपण घेतला आहे.” पुनित बालन आणि जान्हवी धारिवाल यांनी हुतात्मा जवानांसाठी मदत करण्याची घेतलेली भूमिका अभिमानास्पद आहे.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, “”परिवर्तन संस्था आणि बालन समूह करत असलेले सामाजिक काम इतरांसाठी प्रेरणादायी आहे. आठ तालुक्यांतील 52 शाळांमधील विद्यार्थ्यांना सायकल, दप्तर वाटून त्यांना एकप्रकारे आधार देण्याचे काम केले आहे. दि. 11 फेब्रुवारी रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त 251 सायकल आणि 100 संगणक वाटण्यात येणार आहेत.” पुनित बालन म्हणाले, “”वडिलांकडून सामाजिक कार्याचा वारसा घेतला आहे.
एक रुपयातील 30 पैसे टॅक्स, 40 पैसे स्वत:साठी आणि राहिलेले 30 पैसे समाजासाठी खर्च कर असे माझी आई मला सांगते. आत्तापर्यंत अनेक मुलींना दत्तक घेतले आहे. जिल्ह्यातील 1087 शाळांमध्ये ग्रंथालये दिली आहेत. यापुढेही हे कार्य अखंडित सुरु ठेवणार आहे.” जान्हवी धारीवाल म्हणाल्या, “आई, वडील आणि शिक्षक यांच्यामुळे आपली जडणघडण होत असते त्यामुळे त्यांना कधीही विसरु नका.’ या कार्यक्रमात बीड येथील संतोष गर्जे आणि दिप्ती गर्जे यांचा गौरव करण्यात आला. पुनित बालन यांच्यातर्फे त्यांच्या संस्थेस एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. सचिन जगताप यांनी सूत्रसंचालन केले.