नगर – माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या काळात 40 आमदार घेऊन बाहेर पडण्याची व पुलोद सरकार स्थापन करण्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची खेळी ही मुत्सद्देगिरी होती, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे मांडली. या भाष्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या ‘त्या’ खेळीस बेईमानी ठरवण्याच्या सूचक वक्तव्याला आठवलेंनी छेद दिल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान, भारतातील मुस्लिम आधी हिंदू होते, त्या आधी ते बौद्ध होते व त्याच्याही आधी ते वैदिक होते, असे खळबळजनक विधान करताना औरंगजेबाचा उदोउदो येथे करण्याचे कारण नाही, येथील मुस्लिम त्याची कौम नव्हती, असे भाष्यही आठवले यांनी केले.
शिर्डी येथील कार्यक्रमानंतर राशिनच्या कार्यक्रमास जात असताना नगरच्या शासकीय विश्रामगृहावर आठवल्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याला राष्ट्रवादीने गद्दारी संबोधले होते. त्यावर बोलताना फडणवीस यांनी पवारांनी वसंतदादांच्या काळात 40 आमदार घेऊन बाहेर पडणे ही बेईमानी नव्हती का ?असा सवाल केला होता. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना आठवले म्हणाले, पवारांची ती खेळी मुत्सद्देगिरी होती, त्यांनी पुलोद सरकार बनवले होते. त्यात जनसंघाचे हशू अडवाणी आणि उत्तमराव पाटील होते असे स्पष्ट करून एक प्रकारे फडणवीस यांच्या भूमिकेला खोडून काढले.
यावेळी बोलताना आठवले यांनी पवारांना सल्लाही दिला की, त्यांनी राहुल, सोनिया, नितीश कुमार यांच्या नादाला लागू नये. पवार हे राजकीय विचारवंत आहेत. मोदींचे काम पाहून त्यांनी खरंतर मोदींची स्तुती करायला हवी. मात्र, इतरांचे ऐकून ते मोदींवर टीका करतात, असा दावाही आठवले यांनी केला.
देशात औरंगजेबाचा उदो उदो करणे योग्य नाही. प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला दिलेली भेट दलित समाजाला आवडलेली नाही.
औरंगजेब हा भारतातील नाही. भारतातील मुस्लिम हे आधी हिंदू होते, त्या आधीचे बौद्ध होते व त्या आधी ते वैदिक होते. त्यामुळे ओवेसींनी जाणूनबुजून हिंदू विरोध करू नये. औरंगजेब येथील नाही, त्याची कौम येथे नाही, त्यामुळे त्याचा उदो उदो नको व त्यामुळे दोन्ही समाजांने एकमेकाला समजून घेतले पाहिजे तसेच नथूराम गोडसेचे फोटोही कोणी दाखवू नये. वादाचे मुद्दे होतील असे दोन्ही बाजूने कुणी काही करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
दलित पॅंथर पुन्हा सुरू करणार
भारतीय दलित पॅंथरला पन्नास वर्षे पूर्ण झाले आहेत. हे संघटन कोणावर अन्याय करणारे नव्हते तर अन्याय सहन न करणे हीच भूमिका होती. दलित पॅंथरची पुन्हा स्थापना करण्याची सूचना आल्याने त्यावर विचार सुरू आहे. नाशिक येथे 10 जुलैला दलित पंथरचा सुवर्ण महोत्सव होईल व त्यानंतर पुण्यात साहित्यिक व विचारवंतांची बैठक घेऊन नव्या दलित पॅंथरचे स्वरूप, त्यांनी द्यावयाचा लढा व त्यात कोणाला घ्यायचे आधी मुद्द्यांवर चर्चा करू, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
संधी मिळाली तर शिर्डीत उमेदवारी
मोदी, शहा, नड्डा, एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी संधी दिली तर शिर्डीमध्ये मी पुन्हा लोकसभेची उमेदवारी करण्यास उत्सुक आहे. माझी आता 2026 पर्यंत राज्यसभा खासदारकी आहे व ती पुढेही तशीच राहील व 2032 मध्येही ती कायम राहील, असा दावाही त्यांनी केला.