राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चेला उधाण :
वावड्याच असल्याचे शिवतारेंकडून स्पष्ट
रोहन मुजूमदार
पुणे – पुरंदर तालुक्यात करोनाचा प्रसार झपाट्याने होत असून
मृत्यूदरातही देशात अव्वल स्थान पटकावले. त्यामुळे झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आजारपणाही मैदानात उडी घेत पहिले उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार व रविवारी (दि. 27) शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे शिवतारे हे पुन्हा हाती ‘घड्याळ’ बांधणार काय, या चर्चेने पुरंदर तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
करोनाच्य्या उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याने आजारपण बाजूला ठेवत जनतेच्या भल्यासाठी थेट मैदानात आलो आहे. पण विरोधकांना काहीही करून खोळसाडपणा करण्याची सवयच आहे. त्याचा एक भाग म्हणून शिवतारे राष्ट्रवादीत जाणार, अशा वावड्या उठवण्यात आल्या आहेत. पण त्या निरर्थक आहेत. जनतेच्या हितासाठी कोणी झटत असले आणि तो मोठा विरोधक असला तरी त्याचे काम तडीस लावण्यासाठी शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे पवार कुटुंब सातत्याने प्रयत्न करीत असतात, हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याने त्यांची भेट घेतल्याचे विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुंजवणी प्रकल्प हे विजय शिवतारेंच्या आमदारकीतील मंजूर प्रकल्प असून ते तडीस लावण्यासाठी त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. त्यातच गुंजवणी व विमानतळाचे काम वेगाने पुढे जात असून हे ‘क्रेडीट’ शिवतारे खाऊन जातील, अशी भीती विरोधकांना आहे. त्यामुळे ते मुद्दाम खोळसाडपणा करीत असल्याचे बोलले जात आहेत.
- आमदार जगताप अधिकच ‘सतर्क’
पहिले अजित पवार व आता शरद पवार यांनी विजय शिवतारे यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या मागण्या तातडीने सोडवल्याने शिवतारेंना अधिक महत्त्व वाढल्याचे अधोरेखित झाल्याने आमदार संजय जगताप अधिक सतर्क झाले आहेत. शिवतारे यांनी केलेल्या मागण्या या निरर्थक आहेत. त्या उपाययोजना आधीच केल्या असल्याचे आमदार जगताप यांनी आधीच जाहीर केले आहे. तरी शिवतारे यांची राजकारणात झालेल्या ‘एंट्री’ने शिवसैनिकांना बळ मिळाले असून कॉंग्रेसला ‘झटका’ बसला असल्याची चर्चा राजयकीय वर्तुळात रंगली आहे.
- पवारांची भेट; मुख्यमंत्र्यांची का नाही?
विजय शिवतारे हे शिवसेनेचे असून त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. तरी त्यांची भेट न घेता त्यांनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, तालुक्याचा प्रश्न पहिले पालकमंत्र्यांकडे जातो, त्यामुळे त्यांची भेट घेतली. मात्र, विरोधकांकडून राजकारण होत असल्याचा ‘वास’ आल्याने शरद पवारांची भेट घेतली तर येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचे घेतल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे.