पिंपरी – चांगल्या उपचारांसाठी प्रसिद्ध असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वायसीएम (यशवंतराव चव्हाण स्मृती) रुग्णालय गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी वरदान आहे. केवळ शहरातीलच नव्हे तर राज्यभरातून रुग्ण येथे उपचारासाठी येतात परंतु येथील रांगा रुग्णांसाठी शुक्लकाष्ठ बनल्या आहे. टोकण घेण्यापासून ते औषध घेण्यापर्यंत वेगवेगळ्या रांगांमध्येच रुग्णाचे किमान तीन तास जात असल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत.
ज्या विभागात तपासणीसाठी जायचे आहे त्यासाठी पूर्वी केसपेपर काढावा लागत होता. त्यावर तारखेचा शिक्का घ्यावा लागत होता. मात्र आता टोकण काढावे लागत आहे. महिला, पुरूष, ज्येष्ठ नागरिक आणि मनपा कर्मचारी यांच्याकरिता वेगवेगळ्या खिडक्या असल्या तरी टोकण काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना अर्धा तास रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतर संबंधित डॉक्टरकडे गेल्यावरही तपासणीसाठी एक तास तिष्ठत बसून राहावे लागते. तपासणी केल्यावर अनेकांना रक्त, लघवी, एक्स-रे, सोनोग्राफी अशा तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. कधी-कधी तीनही तपासण्या कराव्या लागतात. या तपासणी ऑनलाइन हेल्थ कार्डवर दिलेल्या असल्याने त्याची प्रिंट काढून पैसे भरण्यासाठीही पुन्हा रुग्णाला अर्धा तास रांग लावावी लागते.
पैसे भरून आल्यावर प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील तपासणीसाठी सॅम्पल देण्यासाठीही पुन्हा रुग्णाला अर्धा तास रांग लावावी लागते. सर्व तपासण्या केल्यावर डॉक्टरांनी ऑनलाइन दिलेली औषधे कोणकोणती आहेत आणि त्यासाठी किती पैसे द्यायचे यासाठीही एक रांग असून तिथे रुग्णाला अर्धा तास लागतो. औषधांची चिठ्ठी मिळाल्यावर ती औषधे घेण्यासाठी पुन्हा वेगळी रांग लावावी लागते. या रांगेमध्येही किमान अर्धा तास लागतो.
रुग्ण सकाळी नऊ वाजता आल्यावर तो दुपारी बारा वाजताच घरी जातो. मात्र त्यातही मधुमेहाची चाचणी करायची असल्यास जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर दीड तासांनी पुन्हा तपासणी करावी लागते. यामुळे रुग्णालया कधी कधी दुपारी दोन देखील घरी जाण्यास वाजतात. अनेकदा दहा किंवा अकरा वाजता रुग्ण रुग्णालयात आला की आणखी उशीर लागतो. आधीच आजारपणामुळे रुग्ण बेजार झालेला असतो त्यातच त्याला तीन तास रांगेत उभे राहावे लागल्यास त्या रुग्णाची काय अवस्था असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
सध्या रुग्णालयामध्ये पुरेसे मनुष्यबळ नाही. दोनशे ते सव्वा दोनशे कर्मचाऱ्यांची गरज आहे. बाह्य एजन्सीकडून कर्मचारी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कर्मचारी मिळाल्यास रांगा कमी होतील आणि वेळ वाचेल. त्या दृष्टीने नियोजन करत आहोत.
– राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय