नवी दिल्ली – धैर्य आणि दृढनिश्चय हे आजच्या भारताचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. राष्ट्रीय बाल पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या महत्त्वाच्या काळात हे पुरस्कार प्रदान करण्यात आल्यामुळे हे पुरस्कार अधिक महत्त्वपूर्ण झाले आहेत. ते म्हणाले की भूतकाळातून ऊर्जा मिळवण्याची आणि अमृत काळाच्या पुढील 25 वर्षात उत्कृष्ट परिणाम साध्य करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची हीच वेळ आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त देशातील मुलींना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली इतिहास आणि वीर बाला कनकलता बरुआ, खुदीराम बोस आणि राणी गायडिनीलू यांच्या योगदानाचे स्मरण केले. या स्वातंत्र्य सैनिकांनी लहान वयातच देशाच्या स्वातंत्र्याला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले होते आणि त्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी गेल्या वर्षी दिवाळीत जम्मू आणि काश्मीरच्या नौशेरा क्षेत्राला दिलेल्या भेटीची आठवण सांगितली , जिथे ते बलदेव सिंग आणि बसंत सिंग यांना भेटले, ज्यांनी स्वातंत्र्योत्तर युद्धात बाल सैनिकांची भूमिका बजावली होती. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता इतक्या लहान वयात त्यांच्या सैन्याला मदत केली. पंतप्रधानांनी या वीरांच्या शौर्याला अभिवादन केले.
पंतप्रधानांनी गुरु गोविंद सिंग यांच्या पुत्रांच्या शौर्य आणि बलिदानाची उदाहरणे दिली. जेव्हा साहिबजादांनी अपार शौर्यासह बलिदान दिले तेव्हा ते खूपच लहान होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारताची सभ्यता, संस्कृती, श्रद्धा आणि धर्मासाठी त्यांनी दिलेले बलिदान अतुलनीय आहे. पंतप्रधानांनी युवकांना साहिबजादांबद्दल आणि त्यांच्या बलिदानाबद्दल अधिक जाणून घेण्यास सांगितले.
कोणत्याही क्षेत्रात, धोरणे आणि उपक्रम युवकांना केंद्रस्थानी ठेवतात. त्यांनी स्टार्ट अप इंडिया, स्टॅंड अप इंडिया, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया बरोबरच आत्मनिर्भर भारताची लोक चळवळ आणि आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती यासारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. ते म्हणाले, हे भारतातील तरुणांच्या गतीशी सुसंगत आहे जे या नवीन युगाचे भारतात आणि देशाबाहेरही नेतृत्व करत आहेत. नवोन्मेष आणि स्टार्ट-अप क्षेत्रात भारताचे वाढते सामर्थ्य पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
प्रमुख जागतिक कंपन्यांचे नेतृत्व भारतीय तरुण मुख्य कार्यकारी अधिकारी करत असल्याबद्दल देशाला अभिमान वाटत असल्याचे ते म्हणाले. आज जेव्हा आपण भारतातील तरुणांना स्टार्टअप्सच्या जगात सर्वोत्तम कामगिरी बजावताना पाहतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो. आज भारतातील तरुण अभिनव संशोधन करून , देशाला पुढे नेत आहेत, हे पाहतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो, असे पंतप्रधान म्हणाले.