जयपूर – आम्हाला चित्रपट आवडतात, मग ते दक्षिण, उत्तर किंवा पूर्वेकडील असोत; शिवाय भारतीय सिनेमा म्हणजे जगातील सर्वात मजबूत सदिच्छा दूतांपैकी एक असून आपण भारतीयांनीच आपल्या सिनेमाचा आदर केला पाहिजे, असे मला वाटते, या शब्दांत प्रसिद्ध गीतकार, संवाद लेखक जावेद अख्तर यांनी अप्रत्यक्षपणे “पठाण’ सिनेमाची पाठराखण केली आहे.
येथे सुरु असलेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलदरम्यान बॉलिवुडमधील सिनेमांबाबत सुरु असलेल्या बहिष्काराच्या ट्रेंडबद्दल जावेद अख्तर यांना प्रश्न विचारण्यात आला होता.त्यावेळी ते बोलत होते. अख्तर पुढे म्हणाले की, आम्हाला चित्रपटांबद्दल खूप प्रेम आहे. ते आपल्या डीएनएमध्ये आहे. या सर्वच कथा आपल्या डीएनएमध्ये असतात.
आपल्या चित्रपटांमध्ये गाणी नेहमीच असतात, ही काही नवीन गोष्ट नाही. गाण्याच्या चित्रीकरणाबद्दल आक्षेप असू असतात; पण मग आपणच अपल्या सिनेमाचे कौतुक केले नाही, तर कोण करणार? एक भारतीय चित्रपट सरासरी 135 हून अधिक देशांमध्ये रिलीज होतो. भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वात मजबूत सदिच्छा दूतांपैकी एक आहे.
संभाषणादरम्यान जावेद अख्तर म्हणाले, ‘जगभरातील लोक भारतीय स्टार्सना ओळखतात, कधीकधी हॉलिवूड स्टार्सपेक्षाही जास्त. जर तुम्ही जर्मनीत जाऊन एखाद्याला तुम्ही भारतीय असल्याचे सांगितले तर त्यांचा पहिला प्रश्न असेल, तुम्ही शाहरुख खानला ओळखता का? आमचे लोक आणि आमचे चित्रपट जगामध्ये भारतासाठी सद्भावना पसरवत आहेत. आपण त्यांना वाचवले पाहिजे. त्यामुळे “पठाण’च्या निमित्ताने निर्माण झालेले वाद हे तत्कालीक असल्याचे अख्तर यांनी नमूद केले. सिनेमाच्या आडून कोणी आपली राजकीय पोळी भाजत असेल, तर ते आक्षेपार्ह नाही का, असेही त्यांनी विचारले.