इस्लामाबाद – पाकिस्तानात गेल्या 4 वर्षात 42 पत्रकारांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानचे संसदीय कामकाज मंत्री मुर्तझा जावेद अब्बासी यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. यातील 15 पत्रकारांची हत्या पंजाब प्रांतात, 11 जणांची सिंधमध्ये, 13 जणांची खैबर पख्तुन्वामध्ये आणि 3 पत्रकारांची बलुचिस्तान प्रांतात हत्या करण्यात आली आहे, असे अब्बासी यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात सांगितले. यापैकी बहुतेक पत्रकारांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे.
पत्रकारांच्या रक्षणामध्ये प्रांतीय आणि केंद्रीय सरकार अपयशी पडल्याची टीका जमात ए इस्लामी पक्षाचे खासदार मुस्ताक अहमद यांनी केली आहे. जर या दोषींना अटक झाली असती तर अर्शद शरीफ या पत्रकाराची हत्या होऊ शकली नसती, असेही ते म्हणाले.
पत्रकारांच्या हत्यांप्रकरणी दोन महिन्यांच्या कालावधीत एक सर्वसमावेशक अहवाल तयार करण्यात यावा आणि संसदेत सादर करण्याचे आदेश संसदीय कामकाज मंत्री मुर्तझा जावेद अब्बासी यांनी गृह आणि माहिती मंत्रालयांना दिले आहेत.