पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यात समाधान यात्रा काढण्याचे ठरवले आहे. त्यावर राजकीय नेते प्रशांत किशोर यांनी जोरदार टीका केली आहे. हा लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की नितीशकुमार यांनी आजवर अनेक यात्रा काढल्या पण त्यांच्या कोणत्याच यात्रेने कोणाचेच प्रश्न सुटले नाहीत.
गोपालगंज जिल्ह्यातील बरौली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किशोर बोलत होते. ही समाधान यात्रा ही नितीशकुमार यांची 14 वी यात्रा आहे, पण त्यांच्या गेल्या 13 यात्रांमध्ये राज्यात काहीही बदल झालेला नाही. ही यात्रा केवळ लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे. यात्रेदरम्यान आपल्या आवडत्या मंत्री आणि नोकरशहांच्या बैठका घेऊन लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे ते म्हणाले.
कॉंग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला उपस्थित न राहिल्याबद्दल किशोर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले की, देशाच्या विविध भागांतून इतर राजकीय पक्षांचे नेते कॉंग्रेसच्या यात्रेत सहभागी होत आहेत, परंतु कुमार यांनी भाग घेण्यास नकार दिला. बिहारमधील महागठबंधन सरकारमध्ये कॉंग्रेस भागीदार असूनही कुमार सहभागी झाले नाहीत. यामुळे हे उघड झाले आहे, की त्यांना विरोधी ऐक्यामध्ये कोणतेही स्वारस्य नाही.